गुरुचरित्र भाषांतरित🌹 अध्याय एकोणपन्नास

07:56:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 

 श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारकाने सिद्ध्योग्यांच्या चरणांना वंदन करून त्यांचा जयजयकार केला. तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, आपण माझ्यासाठी कृपासागर आहात. आपण मला प्रत्यक्ष श्रीगुरुचरित्र दाखवून कृतार्थ केलेत. या निमित्ताने तुम्ही मला अनेक धर्म सांगितलेत. त्यामुळे मी धन्य ,धन्य झालो. हा संसारसागर अनादीअनंत आहे. तो महाभयंकर आहे. तो जडजीवांना तरुन जाता येत नाही. आरोग्य बिघडले तर वैद्याचे औषध घ्यावे लागते, त्याप्रमाणे हा संसारसागर तरुण जाण्यासाठी सद्गुरूलाच शरण जावे लागते. त्याच्या कृपेने हा संसारसागर पार करता येतो. यासाठी गुरुभक्ती करावयास हवी. गुरुभक्ती म्हणजे प्रत्यक्ष कामधेनूच. गुरुभक्ती हा मुक्तीचा महामार्ग आहे. या संबंधी स्कंदपुराणात ईश्वरपार्वती संवाद असून तो 'गुरुगीता' या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात पार्वतीने शंकरांना प्रश्न विचारला होता व त्याला शंकरांनी पार्वतीला गुरुमाहात्म्य सांगितले. गुरुभक्ती कशी करावी हे सविस्तर सांगितले आहे. तो बहुमोल उपदेश मला तुमच्याकडून ऐकवायचा आहे. तो कृपा करून मला सांगा."


नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, "बा शिष्या, खरोखर तू धन्य आहेस. तू लोकोपकारक ठरेल असा प्रश्न विचारला आहेस.त्याचे उत्तर मी देतो. तू ते एकाग्रचित्ताने श्रवण कर. रम्य अशा कैलास शिखरावर पार्वतीने भगवान शंकरांना भक्तिभावाने नमस्कार करून विचारले, "गुरुभक्ती कशी करावी ? गुरूचा महिमा काय आहे ते मला सांगा. येथे पार्वती ही साधक असून भगवान शंकर हे परात्पर गुरु आहेत. 'मला गुरुमाहात्म्य सांगा' असे पार्वती म्हणाली असता भगवान शंकर म्हणाले, "देवी तू फार उत्तम प्रश्न विचारला आहेस. सर्व लोकांना उपकारक ठरेल अशा तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देतो. लक्षपूर्वक श्रवण कर.भगवान शंकर म्हणाले, तिन्ही लोकांत दुर्लभ असे गुरुतत्व तुला सांगतो. श्रीगुरूच सदैव ब्रम्ह होय, गुरुशिवाय दुसरे ब्रम्ह नाही, हे त्रिवार सत्य. वेदशास्त्र-पुराणे कितीही वाचली, व्रत-तप तीर्थयात्रा कितीही केल्या तरी संसारबंधनातून मुक्त होता येत नाही. शैवशाक्तादी विविध पंथ जीवांना, चुकीचा समज, गैरसमज करून देण्यास कारणीभूत होतात. साधकांच्या मनात भ्रम निर्माण करतात. यज्ञ, व्रत, तप, दानधर्म, तीर्थयात्रा करणारे लोक जोपर्यंत गुरुतत्व जानीत नाहीत तोपर्यंत मूर्खांसारखे भटकत राहतात ज्ञानस्वरूप आत्म्याहून श्रीगुरू भिन्न नाही. आपल्या गुरूविषयी पूज्यबुद्धी श्रद्धा असली की मग गुरुभाक्ताला दुसरे काहीही कर्तव्य असत नाही. म्हणून गुरुभक्ती प्राप्त व्हावी यासाठी साधकांनी प्रयत्न करावा. या देहांत अज्ञानाने उत्पन्न झालेली जगन्माया गुप्त विद्येच्या रुपात राहते. आत्मप्रकाश किंवा आत्मविकासाने ज्ञानाचा उदय होतो. गुरु शब्दाने तो उदय दर्शविला जातो.. श्रीगुरुचरणांच्या सेवेने अंतःकरण सर्व पापांतून मुक्त होते. त्यामुळे देहधारी जीव ब्रम्हरूप होतो. श्रीगुरुचरणकमलांचे स्मरण करून चरणतीर्थ मस्तकी धारण केले असता सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल साधकाला प्राप्त होते. विविध तपांतून मुक्ती मिळते. सद्गुरुचरणतीर्थ सर्व तीर्थाचे माहेर होय. श्रीगुरूचरणतीर्थ पापहरक आहे. ज्ञानरुपी तेजाला अधिक प्रकाशित करणारे आहे. संसारसागरातून पार करणारे आहे. ते समूळ अज्ञान दूर करते. जन्मकर्मांचे निवारण करते.


ज्ञान-वैराग्यासाठी ते प्राशन करावे. गुरुचरणतीर्थ प्राशन करून श्रीगुरू आज्ञापालन हेच उच्छिष्ट भोजन मानून श्रीगुरुमूर्तींचे ध्यान करीत गुरुमंत्राचा सदैव जप करावा. श्रीगुरुचे निवासस्थान हेच काशीक्षेत्र, चरणतीर्थ हीच गंगा व श्रीगुरु हेच प्रत्यक्ष श्रीविश्वेश्वर समजावेत. श्रीगुरुचे चरणतीर्थ हेच साक्षात गयातीर्थ. गुरु हेच गयेचा नित्य स्मरण करावे. गुरुनामाचा जप करावा. गुरुआज्ञा मनःपूर्वक पाळावी. गुरुशिवाय दुसरी कोणतीही भावना मनात ठेवू नये. गुरु ब्रम्हरूप होय. ते गुरुकृपेनेच प्राप्त होते, म्हणून सदैव गुरुचे ध्यान करावे. चिंतन करावे. आपले घरदार, संपत्ती, विद्या, वैभव इत्यादींची आसक्ती सोडून द्यावी. गुरुशिवाय अन्य कशातही भावना ठेवू नये. जे अनन्य भावाने, निष्ठेने गुरुचे चिंतन करतात त्यांना परमपद सुलभ असते, म्हणून प्रयत्नपूर्वक श्रीगुरुची आराधना करावी. गुरुमुखी असलेली विद्या, गुरुभक्तीशिवाय प्राप्त होत नाही.


'गुरु' शब्दातील 'गु' अक्षराचा अर्थ अज्ञानरुपी अंधकार. 'रु' चा अर्थ ज्ञानप्रकाश. अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रम्ह गुरु होय यात शंकाच नाही. 'गुरु' शब्दातील 'गु' कार मायादी गुण प्रकट करणारा असून 'रु' कार ब्रम्हाचे द्योतक आहे. गुरु हा मायानिर्मित भ्रमनिरसन करणारा आहे. गुरुचरण श्रेष्ठ होत. ते देवांनाही दुर्लभ आहेत गुरुहून श्रेष्ठ दुसरे तत्व नाही, म्हणून गुरु संतुष्ट होण्यासाठी सर्व काही गुरूला अर्पण करावे. श्रीगुरुची आराधना करावी. आपले सर्वस्व गुरूला समर्पण करावे. गुरुकृपा परमेश्वरप्राप्तीचे साधन आहे. काया-वाचा-मनाने सदैव गुरूची आराधना करावी. आपल्या गुरूला सर्वभावे शरण जावे. श्रीगुरूला साष्टांग नमस्कार घालावा. संसारवृक्ष आरूढ होऊन नरकार्णवात पतन झालेल्या सर्वांचा ज्याने उद्धार केला त्या श्रीगुरुला नमस्कार करावा.


गुरु हाच ब्रम्हा, विष्णू, महेश्स्वरूप आहे. गुरूच परब्रम्ह आहे म्हणून अशा गुरूला नमस्कार करावा. गुरु हा जगाच्या उत्पत्तीचा हेतू आहे. तो संसारसागर पार पाडणारा सेतू असून सर्व विद्यांना प्रभावित करणारा उदयस्थान आहे. अशा शिवस्वरूप गुरूला नमस्कार करावा. अज्ञानरुपी अंधाराने अंध झालेल्या जीवाच्या नेत्रांत ज्ञानांजन घालून ज्याने दिव्यचक्षू उघडले व त्याला आत्मस्वरूपाचा निधी दाखविला त्या श्रीगुरुला सदैव नमस्कार करावा. गुरु हाच माता-पिता बंधू आहे. या गुरूच्या अस्तित्वाने जगाला अस्तित्व येते. त्याच्याच प्रकाशाने जग प्रकाशते व त्याच्याच आनंदमयी स्वरूपाने सर्वजण आनंदित व सुखी होतात. जगाला अर्थ येतो तो गुरूमुळे. जीवन सार्थ होते ते गुरूमुळे. जग अशाश्वत असुअनहि नित्याचे वाटते ते गुरूमुळे. गुरु म्हणजे दैदिप्य्मान आत्मसूर्य. ज्याच्यामुळे हे जग चेतन स्वरूपाने अनुभवास येते, ज्याच्यामुळे ह्या विश्वाला सजीवता प्राप्त होते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती इत्यादी अवस्था ज्याच्यामुळे प्रकाशित होतात त्या गुरूला नमस्कार. श्रीगुरुमुळेच विश्व शिवाहून भिन्न दिसत नाही. तो पूर्ण अभेदयोगी असतो. जगाचे मूळ कारण सद्गुरु. गुरुचे कार्य जगतरूपाने भासते. गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे. गुरु म्हणजे सर्व सामर्थ्यशाली शक्ती होय. गुरु हा अव्यक्त परमेश्वराचे व्यक्तरुप होय. श्रीगुरुचे चरण सुख-दुःखादी द्वंद्वापासून होणारा त्रास नाहीसा करतात. सर्व आपत्तीतून तारून नेतात. शिव क्रुद्ध झाला तर गुरु शरण करतो; पण गुरूच रुष्ट झाला तर आपला त्राता कोणीही असत नाही. गुरुचरण शिवशक्तीरूप असतात. शिव आणि शक्ती ह्यांच्या मिलापाने व्यक्त झालेले रूप म्हणजे श्रीगुरु. जो गुणरूपांच्या पलीकडे-म्हणजेच निर्गुण, निराकार स्वरूपाचा साक्षात्कार करून देतो त्यालाच गुरु ही संज्ञा प्राप्त होते. गुरु हा त्रिनेत्र नसूनही शिवरूप आहे. चतुर्भुज नसूनही विष्णू आहे व चतुर्मुख नसूनही ब्रम्हदेव आहे. श्रीगुरुच्या कृपेमुळेच जीवाला भेदात्मक संसारातून मुक्त होता येते. तो दयासागर आहे. त्याच्या कृपेला भारती यावी म्हणून त्याला हात जोडून प्रणाम करावा. श्रीगुरुचे परमरूप विवेकरुपी चक्षूंसाठी अमृतासमान असते; पण मंदभाग्य असलेले जिब ह्या गुरुस्वरूपाला बघू शकत नाही. ज्या दिशेला चरणयुगल असतात त्या दिशेला दररोज भक्तिपूर्वक नमस्कार करावा. एक गुरुभक्ती जमली की इतर साधना आपोआप होतात. श्रीगुरूगीता गुरुभक्तीयोगाचे शास्त्रच आहे. श्रीगुरुचा अनुग्रह झाला की अज्ञानाचा नाश होतो. संसारवणवा नष्ट होतो. सच्चिदानंदस्वरूप त्याचा अवतार असतो. गुरु हा केवळ ब्रम्हविद्या देत नाही, तर तो आत्मसाक्षात्काराचा अनुभव प्राप्त करून देतो. गुरुचे केवळ स्मरण केले असता आपोआप ज्ञान उत्पन्न होते. गुरु हा चैतन्यस्वरूप, शाश्वत, शांत आकाशदिशापेक्षा सूक्ष्म, निरंजन नादातीत असतो. सर्व चराचर सजीव-निर्जीव जग श्रीगुरुचे व्यापले आहे. गुरु हा साधकाला भक्ती-मुक्ती, भोग व मोक्ष देतो. तो आपल्या आत्मज्ञानाच्या प्रभावाने अनेक जन्मांतील संचित कर्माचे भस्म करतो. गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही.


गुरुसेवा व गुरुभक्ती याहून श्रेष्ठ दुसरे तप नाही. गुरु हा सर्व जगाचा स्वामी असून तो सर्वव्यापी आहे. गुरुतत्व स्वयंभू आहे. गुरु हेच परमदैवत आहे. म्हणून गुरूला सदैव नमस्कार करावा. गुरूच्या चरणतीर्थात सप्तसमुद्रात स्नान केल्याचे फळ मिळते. श्रीहरी कोपला तर गुरु भक्ताचे रक्षण करतो; पण गुरूच रुष्ट झाला तर भक्ताला त्राता कोणीही नाही. म्हणून गुरूची मनःपूर्वक पूजा करावी. गुरुभक्ती केल्याने आत्मज्ञान प्राप्त होते. गुरुहून श्रेष्ठ कोणीही नाही असे श्रुतिवचन आहे, म्हणून काया-वाचा-मनाने गुरूची नित्य सेवा करावी.


केवळ गुरुकृपेमुळेच ब्रम्हा-विष्णू-महेश जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करू शकतात, अखंड गुरुस्मरण घडणे हीच गुरुसेवा. देव-गन्धर्वादीसुद्धा जर गुरुसेवा करणार नसतील तर ते मुक्त होऊ शकत नाहीत. गुरुध्यान हे सर्वप्रकारचा आनंद, सुख, भक्तीमुक्ती व मोक्ष देणारे आहे. म्हणूनच परब्रम्हस्वरूप गुरुचे स्मरण करावे. त्याचे स्तवन करावे. त्याला नमस्कार करावा, गुरु हा ब्रम्हानंदस्वरूप, ज्ञानस्वरूप, द्वंद्वरहित, निर्लेप, सर्वसाक्षी भावावीत, त्रिगुणरहित असतो. तो नित्य बद्ध, निराकार, परब्रम्हस्वरूप आहे. तो आनंदस्वरूप,आनंददाता, ज्ञानस्वरूप, योगीश्वर, संसाररोगावर औषध देणारा वैद्य आहे. गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही. हे शिवशासन आहे म्हणूनच तो परमकल्याणकारी आहे. अशाप्रकारे गुरुध्यान केल्यास शिष्याच्या ठायी आत्मज्ञान आपोआप येते. गुरूने दाखविलेल्या मार्गानेच साधना करून चित्तशुद्धी करून घ्यावी.


भगवान सदाशिव पार्वतीला म्हणतात, "हे गुरुमाहात्म्य ऐकूनही जो गुरुनिंदा करील तो घोर नरकात पडेल. बुद्धिमान शिष्याने गुरूशी कधीही खोटे बोलू नये. गुरु फसत नाही-फसतो तो शिष्य. गुरुकृपा-प्राप्त साधकाने निःशंकपणे साधना करावी. जेथे गुरुप्राप्ती आहे तेथे भीती असूच शकत नाही.


गुरुगीता गुरुभक्ती शिकविते. गुरुमहती पटविते. श्रीगुरूगीता श्रुतिस्मृतींचे सार होय. श्रीगुरुगीता म्हणजेच गुरुजप. गुरुसेवकाला केवळ गुरुसेवेने चारी आश्रम पुरे करता येतात. गुरुसेवा म्हणजे गुरुउपदेशानुसार साधना करणे. गुरुसेवेने गुरुप्रसाद लाभला की आत्मसाक्षात्कार होतो. गुरुभक्ताला गुरुउपसानेनुसार शाश्वती लाभते. गुरुध्यान हा साक्षात्काराचा सोपा व खात्रीचा उपाय आहे.


यानंतर पार्वतीने महादेवांना पिंड, पद, रूप व रूपातित म्हणजे काय असे विचारले असता भगवान शंकर म्हणाले, "कुंडलिनीशक्तीला पिंड म्हणतात. हंस म्हणजे पद. बिंदूला रूप व निरंजन निराकार परमात्म्याला रूपातीत म्हणतात. ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली, ज्याचा 'हंस:' मंत्राक्षरात प्राण स्थिर झाला व ज्याला आत्मज्योतीचे नील बिंदूत दर्शन झाले आहे व जो निर्विकल्प स्थितीत आहे, तोच मुक्त. साधकाला साक्षात्कार झाला की तो अनासक्त होतो. गुरुकृपा - प्रसादाने त्याचे मन शांत होते. मग तो प्रारब्धाने जे सहज मिळेल ते अलिप्तपणे भोगतो. त्याला बसल्याजागी आनंद, शांती लाभते.


यानंतर भगवान शंकरांनी श्रीगुरूगीतेचे भक्तिपूर्वक पठणश्रवण केल्याने कोणते विशेष फळ मिळते ते सांगितले. श्रीगुरूगीतेच्या पठणश्रवणाने साधकाला नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त होते. तो भव्यव्याधीतून मुक्त होतो. सर्वप्रकारचे पाप, ताप, दैन्य, दुःख नाहीसे होते. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व्याधी नाहीशा होतात. सर्व सिद्धींची प्राप्त होते. प्रारब्धाने जरी असाध्य रोग निर्माण झाला, तरी साधक श्रीगुरूगीता जपाने रोगमुक्त होतो. म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने योग्यस्थळी, योग्य आसनावर बसून परमश्रद्धेने स्वतःच श्रीगुरुगीता पाठ करावा. त्यामुळे जीवन सार्थ, कृतकृत्य, यशस्वी व मंगलदायी होते. इच्छापूर्ती होते. गुरुप्रसाद लाभतो. श्रीगुरूगीतेच्या जपाने साधकाला दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, पुत्र-पौत्र इत्यादींचा लाभ होतो. श्रीगुरुगीता सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आहे. कल्पवृक्ष आहे. साक्षात चिंतामणी आहे. एका श्रीगुरूगीतेच्या उपासनेने सर्व देवदेवतांची उपासना होते. श्रीगुरूगीतेच्या पठणाने जीवाशिवाचे ऐक्य होते. त्याच्यावर सरस्वतीची पूर्ण कृपा होते. असे सांगून भगवान सदाशिव म्हणतात, मी सांगितलेले ते त्रिवार सत्य आहे. श्रीगुरूगीतेचे पठणश्रवण करणाऱ्याला अनंत फलप्राप्ती होते.


अशाप्रकारे भगवान शंकरांनी श्रीगुरूभक्तीचे व श्रीगुरुगीतेचे माहात्म्य पार्वतीला सांगितले. सिद्धयोग्यांनी त्याचा आश्रय नामधारकाला सांगितला. सारांश, शहाण्याने गुरु नित्य भजावा. गुरुसेवेचे फळ अनंत आहे. श्रीगुरुला शरण जावे. श्रीगुरू संतुष्ट झाले असता त्रैमूर्ती संतुष्ट होतात. याला वेदशास्त्री संमती आहे. या कलियुगात वेदमार्ग लोप पावला. लोक मूर्ख झाले. पशुसमान वागू लागले. डोळे-कान असूनही अंध-बहिरे झाले आहेत, म्हणून शहाण्या माणसाने मनात गुरुभाव धारण करावा. त्यामुळे मनात गुरुभाव धारण करावा. त्यामुळे भवबंधनातून सुटका होईल. कैवल्यपदाची प्राप्ती होईल. या कलियुगात संत-सज्जनांचा उद्धार करण्यासाठी, भूभार हलका करण्यासाठी श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वतींनी नावांनी घेतला. गुरुभक्ती ही कामधेनू आहे. याविषयी शंका न धरता श्रीगुरुंना शरण जावे. त्यामुळे यमपाश तुटेल. सर्व पातकांचा क्षय होईल.


अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'गुरुमाहात्म्य - श्रीगुरुगीता' नावाचा अध्याय एकोणपन्नासावा समाप्त.


॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

You Might Also Like

0 comments: