गुरुचरित्र अध्याय एकावन्न

07:53:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 श्रीगुरू नृसिंहसरस्वतींचे निजानंदगमन

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 

श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारक शिष्य सिद्ध्योग्य चरणांना वंदन करून म्हणाला, "यवनराजाने श्रीगुरू नृसिंहसरस्वतींना त्याच्या बिदर नगराला गेले होते. तेथून श्रीगुरू गाणगापुरात परत आले असे तुम्ही यापूर्वी सांगितलेत. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा." त्यावर सिद्धयोगी म्हणाले, "बाळा, आता पुढे काय झाले ते मी तुला सांगतो. ती विशेष घटना तू लक्षपूर्वक ऐक. ही कथा श्रवण करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात." श्रीगुरू यवनराजाला त्याच्या नगरात भेटून गाणगापुरात परत आले. परत आल्यावर त्यांनी एक विचार पक्का केला, की आता हा पसारा खूप वाढला आहे. लोकांना खरा परमेश्वर समजावा. नुसती व्यक्तीची पूजा असू नये. आता आपण गुप्त होऊन अवतारसमाप्ती करावी. मग त्यांनी आपल्या शिष्यांना व भक्तांना आपण श्रीशैल्यपर्वतावर जाऊन तेथेच गुप्तपणे राहणार असे सांगितले. प्रस्थानाची सर्व तयारी झाली. श्रीगुरू शिष्यांसमवेत श्रीशैलयात्रेला म्हणून निघाले. त्यावेळी भक्तजनांना अतिशय वाईट वाटले. ते श्रीगुरुंच्या चरणी पडून म्हणाले, "स्वामी, आम्हाला सोडून आपण का बरे जाता ? स्वामी, तुम्ही आम्हा भक्तांसाठी कामधेनू आहात. तुमच्या केवळ दर्शनाने सर्व पातके दाही दिशांना पळून जातात. तुमच्या कृपेने आमच्या सर्व कामना पूर्ण होतात. आई आपल्या बालकाचा कधी त्याग करते का ? तुम्हीच आमचे माता-पिता सर्व काही आहात. आमच्यावर कृपा करा. आम्हाला सोडून जाऊ नका."


सर्व भक्तांनी अशी परोपरीने विनवणी केली असता श्रीगुरू त्या सर्वांना अत्यंत प्रेमाने म्हणाले, "भक्तजन हो, तुम्ही कसलीही चिंता करू नका. मी तुम्हाला सोडून कोठेही जाणार नाही. मी याच गाणगापुरात, नित्य अमरजा संगमात स्नान करून मठातच गुप्तपणे राहीन, याविषयी तुम्ही निश्चिंत राहा. जे लोक माझी नित्य भक्ती करतील त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईन. मात्र जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्या दृष्टीने मी शैल्य्यात्रेला जात आहे. मी प्रातःकाली कृष्णानदीत स्नान करीन. कृष्णा-पंचगंगा संगमावर औदुंबरक्षेत्री अनुष्ठान करीन. संगमावर पुन्हा स्नान करीन. मध्यान्हकाळी मठात येईन. तेथे मी भक्तांच्या पूजेचा स्वीकार करीन. तुम्ही कसलही चिंता करू नका. आम्ही गाणगापुरात निरंतर वास्तव्य करणार आहोत. जे लोक आमची भक्ती करतात, आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतात ते आम्हाला विशेष प्रिय आहेत. त्यांच्या सर्व कामना, इच्छा त्वरित पूर्ण होतील. हे आमचे वचन त्रिवार सत्य आहे. अमरजा संगमावर जो अश्वथवृक्ष आहे तो कल्पवृक्ष आहे. त्याची नित्य पूजा करा म्हणजे तुमच्या मनात ज्या इच्छा असतील त्या खात्रीने पूर्ण होतील. मी मठात माझ्या निर्गुण पादुका ठेवीत आहे. अश्वत्थाची पूजा करून मठात येत चला व तेथे माझ्या निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करीत जा. विघ्नहर्त्या चिंतामणी श्रीगणेशाची पूजा करा. त्यामुळे तुमच्या सर्व चिंता नाहीशा होऊन इच्छित फळ मिळेल. आमची दररोज त्रिकाल आरती करावी म्हणजे सर्व कार्ये सिद्धीला जातील." अशा रीतीने सर्व भक्तजनांची समजूत घालून, त्यांना आशीर्वाद देऊन श्रीगुरू नृसिंहसरस्वती श्रीशैल्ययात्रेसाठी निघाले. सर्व भक्त त्यांना प्रेमाचा निरोप देऊन मठात परत आले. त्यावेळी त्यांना श्रीगुरू मठातच आहे असे दिसले.


श्रीगुरू आपल्या चार शिष्यांसह पाताळगंगेच्या तीरावर आले. त्यांनी शिष्यांना सांगितले, " माझ्यासाठी फुलांचे आसन तयार करा, मी या नदीतून श्रीशैल्यपर्वतापर्यंत जाईन व मल्लिकार्जुनाशी ऐक्य साधून राहीन." श्रीगुरुंनी असे सांगताच शिष्यांनी शेवंती, कमळ, मालती, कल्हार अशी फुले केळीच्या पानात गुंडाळून आणली. त्या फुलांचे त्यांनी सुंदर आसन तयार करून ते गंगेच्या पवित्र पाण्यावर ठेवले. मग श्रीगुरू त्यांना म्हणाले, "आता तुम्ही गावात परत जा."


हे ऐकताच सर्व शिष्य दुःखी झाले. श्रीगुरू त्यांना समजावीत म्हणाले, "आम्ही गाणगापुरातच मठात असू. तुम्हाला दर्शन देऊ. कसलीही चिंता करू नका. लौकिकदृष्ट्या आम्ही जात आहोत असे दिसले तरी आम्ही नित्य भक्तांच्या घरीच असू, याची खात्री बाळगा." असे सांगून श्रीगुरू उठले व नदीतील आसनावर जाऊन बसले. आता मी निजस्थानी जातो. तेथे गेल्यावर प्रवाहातून फुले प्रसाद म्हणून पाठवितो." असे ते शिष्यांना म्हणाले. त्यावेळी कन्या राशीत गुरु होता. बहुधान्य नाम संवत्सर होते. त्या दिवशी माघ वद्य प्रतिपदा होती. वार शुक्रवार होता. शिशिरऋतू होता.


श्रीगुरू निजानंदी बसले, त्यावेळी ते शिष्यांना म्हणाले, "आम्ही निजधामाला जात आहोत. तेथे पोचल्याची खूण म्हणून शेवंतीची चार प्रसादपुष्पे प्रवाहात वाहत येतील. ती तुम्ही घ्या. आमची नित्य पूजा करीत जा. त्यामुळे तुमच्या घरी अखंड लक्ष्मी राहील. आम्हाला गायन खूप आवडते. ज्या घरी आमचे स्तोत्रगान चालू असेल त्या घरी आम्ही अखंड वास्तव्य करतो. आमचे जो नेहमी स्तोत्रगान करतो त्याला कसलीही व्याधी येणार नाही. त्याचे दारिद्र्य नाहीसे होईल. त्याला पुत्रपौत्र प्राप्त होतील. तो निरामय शतायुषी होईल. जे कोणी आमचे चरित्र श्रवण-पठण करतील त्यांच्या घरी लक्ष्मी नांदेल. याविषयी संदेह नसावा." असे आपल्या शिष्यभक्तांना आश्वासन देऊन श्रीगुरू एकाएकी गुप्त झाले.


सगळे भक्त तेथेच चिंता करीत बसले त्यावेळी एका नावेतून काही नावाडी आले. ते त्या शिष्यांना नमस्कार करून म्हणाले, "आम्ही पैलतीरी होतो. तेथे आम्ही श्रीगुरुंना पाहिले. संन्यासी वेषात असलेल्या त्यांनी हातात दंड धारण केला होता. त्यांनी स्वतःचे नाव श्रीनृसिंहसरस्वती असे सांगितले. त्यांनी तुम्हाला एक निरोप सांगितला आहे. "आम्ही कर्दळीवनी जात असलो तरी नित्य गाणगापुरातच असू." त्यांनी जाताना असेही सांगितले की, तुम्ही आता तुमच्या घरी जावे. वंशोवंशी माझी भक्ती करीत सुखाने राहावे. प्रसादपुष्पे आल्यानंतर ती शिष्यांनी घ्यावीत असे आम्हाला सांगून श्रीगुरू एकाएकी अदृश्य झाले. ते नावाडी असे सांगत होते तोच प्रसादपुष्पे वाहत आली. तू चार शिष्यांनी घेतली.


सिद्धयोगी असे सांगत होते त्यावेळी नामधारकाने विचारले, "ते चार प्रमुख शिष्य कोण ?" त्यावर सिद्धयोगी म्हणाले, "श्रीगुरुंचे अनेक शिष्य होते. श्रीगुरुंनी त्यांना संन्यासदीक्षा देऊन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पाठविले. त्यातील कृष्णसरस्वती, बालसरस्वती व उपेंद्रसरस्वती व माधवसरस्वती या चौघांनाही तीर्थयात्रेला पाठविले. श्रीगुरू निजधामाला गेले त्यावेळी सायंदेव साखरे, कवीश्वर नाव दिलेला नंदीब्राम्हण, नरहरी कवी आणि मी स्वतः असे चौघेजण त्यांच्याबरोबर होतो. आम्ही ती पुष्पे काढून घेतली. ते पुष्प आजही माझ्याकडे आहे. त्याची मी नित्य पूजा करतो." असे सांगून सिद्धयोग्यांनी नामधारकाला ते शेवंतीचे पुष्प दाखविले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, श्रीगुरू नृसिंहसरस्वतींचा महिमा हा असा मोठा फार अद्भुत, अपूर्व आहे. तो अपार आहे. त्यातील फार मोठा भाग मी तुला सांगितला. नामधारका, साक्षात कामधेनू असेलेले श्रीगुरुचरित्र मी तुला सविस्तर सांगितले. आता तुझे दैन्य, दारिद्र्य पळून गेले असेच समज. हे श्रीगुरूचरित्र लिहून काढतील किंवा याचे जे श्रवण-पठण करतील ते लक्ष्मीवंत होतील. त्यांना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल. त्यांच्या मातृ-पितृ उभयपक्षी महानंद होईल. त्यांना पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल."


असे हे श्रीगुरुचरित्र सिद्धांनी नामधारकाला सांगितले. ते ऐकून नामधारकाला परमानंद प्राप्त झाला. त्याच्या सर्व इच्छा तत्काळ पूर्ण झाल्या.


ग्रंथकार सरस्वती म्हणतात, "नामधारकाने या श्रीगुरुचरित्राचे जे मोठ्या भक्तिभावाने श्रवण-पठण करतील. त्यांना धर्मार्थकाममोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. श्रीगुरू नृसिंहसरस्वती त्यांचे वंशोवंशी रक्षण करतील, म्हणून सरस्वती गंगाधर श्रोत्यांना वंदन करून सांगतात, "श्रोते हो ! सर्व इच्छा, कामना पूर्ण करणाऱ्या या श्रीगुरूचरित्राचे तुम्ही नित्य भक्तिभावाने, श्रद्धेने श्रवण-पठण करा. तुमचे सदैव कल्याण होईल."


अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीगुरू नृसिंहसरस्वतींचे निजानंदगमन' नावाचा अध्याय एकावन्नावा समाप्त.


॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

You Might Also Like

0 comments: