Adhyay 34 (अध्याय ३४)

09:37:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 

हाड्याव्रण गोष्ट  


ह्या विश्वाच्या राजा परमात्म्याला एका सामान्य माणसाच्या रूपामधे बघणे कुणालाच लगेच पचत नाही. स्वामी समर्थांच्या देऊळ बंद ह्या चित्रपटात आपण बघतो. अनुभव आल्याशिवाय कुणीच नमस्कार करायला मान्य होत नाही. मन मानायलाच तयार नसते.  

बेसिकली आपण सगळेच स्वतःला खूप ग्रेट समजत असतो. डाॅक्टर त्या काळात MBBS होते. (ज्या वेळी बोटावर मोजण्याइतके अॅलोपाथि डाॅक्टर होत असत). त्यामुळे मला सगळे कळते हा भाव होता.

आपण देवाला सुद्धा condition घालायला कचरत नाही. डाॅक्टरांनी सुद्धा म्हटले माझ्या रूग्णाचा ताप गेला तर मी येईन. साई माऊली तेही accept करते. पण डाॅक्टरांना चिडीच्या पायाला दोर बांधल्यासारखे ओढून घेतात. 
निर्माण झालेले अडथळे दूर करतात. 

"मलाच काय ते कळते " या अंहकारी वृत्तीमुळेच परमात्म्याचरणी जायला उगाचच वेळ जातो. हा अहंकारच मनात संशय, तर्क-कुतर्क निर्माण करतो. त्यात हे कलियुग. आजूबाजूची परिस्थिती आणि श्रद्धाहीन त्यात भर घालतच जातात.... म्हणूनच बुद्धीचे मनावरचे नियंत्रण सुटते आणि मग त्या बाबालाच आपल्याजवळ धावून यावे लागते.... केवढे हे त्याचे प्रेम !  

ह्या साईनाथाला ज्याला आपल्याकडे खेचायचे असते त्याला तो बरोब्बर आपल्याजवळ खेचतोच ! मालेगावच्या डॉकटरांना सुद्धा असेच खेचायचे बाबांच्या मनात आहे.    

कवाडे बंद होती चारी बाजूला 
तरी कसा बापू माझा येतांचि राहिला...     

केवढा मोठा अनुभव दिला आहे बाबांनी ... चक्क तीन वेळा स्वतः कडे बोलावले आहे ! 

हेच ते बाबांचे त्रिविध पातळीवरचे कार्य... बाबांनी याद्वारे डॉक्टरांच्या मनातील संशय, कुतर्क आणि अहंकार यांची धुलाई करून मस्त त्रिशुद्धी केली आहे. 

वो प्यार से आता है 
वो हाथ पकडता है 
वो सेतू बंधाता है    
मुझको बस चलना है .... 

... आणि शेवटी डॉकटर बाबांकडे जाऊन पोचलेच ! 


ह्या कथेत इतरही काही गोष्टी समजतात : 

१) मालेगावचे डॉक्टर अतिशय निष्णात असल्याचे कथेत नमूद केले आहे. पण तरीही पुतण्याच्या रोगावर त्यांना इलाज सापडला नाही.... असा दुर्धर आजार ज्याच्या उदीने आणि कृपादृष्टीने बरा होतो तो हा साईबाबा ! 

हा बापूसाई तर डॉक्टरसोबतच सद्गुरू सुद्धा आहे. ह्याला बरा करता आला नाही असा रोगच नाही ! केवळ बाह्य शरीराचेच नाही, तर मनाचे आजारही बरे करतो.. मनसामर्थ्यदाता ! एवढी ताकद जगातल्या कोणत्याच डॉक्टरकडे नाही. 

पण हे समजून सुद्धा बाबांकडे जायला मन तयार नाही.. खरेच दुर्भाग्य !

२) विज्ञान जिथे संपते तिथेच अध्यात्म सुरू होते.. अशा रोगावर इलाज तर बाकी कुलदैवते आणि देवतासुद्धा करू शकल्या नाहीत... कामी आल्या नाहीत. 

पण हा साई परमात्मा आहे. ह्याला अशक्य असे काहीच नाही. ह्याच्यापुढे कोणता रोग टिकू शकणार ? 

३) आपल्या कानावर साईबद्दल काही येणे ही त्या साईचीच आपल्यावर झालेली कृपा आहे. आपल्या प्रगतीची वाटच हा साई अगदी आपल्या समोर उघडी करून ठेवत असतो. 

बेसिकली आपण साईकडे जाणारे कोण ? हा साईच आपल्याकडे कुणामार्फत येतो.. आपल्या उद्धारासाठी ... 

इतुके सोपे जीवन केले 
बसल्या जागी देव आले ... 

४) साईनाथ सगळ्याचे क्रेडिट मोठी आई मशीदमाईला देतो. स्वतः कडे मोठेपणा घेत नाही. 

आपण मात्र सगळ्याचे क्रेडिट मलाच मिळावे म्हणून आपली सतत धडपड सुरू असते.       

५) हा केवळ साईनाथच आपल्याला समजून घेऊ शकतो. बाकी कुणी नाही. आपल्यासारख्या सामान्य मानवामध्ये अहंकार असू शकतो हे तो बाबच जाणून घेऊन आपल्याला समजून घेतो... आणि म्हणूनच हा बाबा वारंवार अनेक संधी उपलब्ध करून देतो. सतत आपल्याला हाक मारत असतो... ते ही आपल्याच उद्धारासाठी.      

६) एक अजून महत्तवाची गोष्ट लक्षात येते. बाबा सारखे बोलावत होते. पण नेमका समोर एक दूषित ज्वर झालेला रुग्ण होता. त्याला सोडून ते साईकडे धावत आले नाहीत. एका डॉक्टराचे कर्तव्य चोख बजाऊनच त्यांनी बाबांकडे यायचा विचार केला. 

आणि या सुंदर विचारामुळेच बाबा प्रसन्न झाले आणि लगेचच त्या रुग्णास आराम पडला. ही सुद्धा बाबाचीच किमया. तो ही एक सुंदर अनुभव दिला बाबांनी !       

७) बाबांची उदी ही सगळ्यावर रामबाण इलाज आहे. पण केव्हा ? जेव्हा बाबांवरील पूर्ण विश्वासाने आपण ती लावतो तेव्हाच ! 

शेवटी एवढेच वाटते..  आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने ह्या बापूकडे खेचलो गेलो आहोत... आपल्याला जो आनंद मिळतोय, तो इतरांनाही मिळावा, याकरताच आपण आपल्या अनेक आप्त-मित्रांना बाबाकडे येण्याचा आग्रह धरतो. पण तरीही या डॉक्तरांप्रमाणेच ते यायला कबूल होत नाहीत. पण हा बाबा योग्य वेळ आल्यावर त्यांना खेचणारच आहे हा दृढ विश्वास मनी बाळगूया आणि आपल्याला त्यांच्याकडे खेचून घेतल्याबद्दल पहिले अंबज्ञ म्हणूया !      




---------------------




डॉ. पिल्ले नारू कथेविषयी माझे विचार



भूलोकी जन्म घेता 
जन्म मरणाचे चक्र 
नाही चुकले कुणाला
भय दुःख मागे लागे

ओझी वाहतो कर्माची 
भार वाढतची राहे 
बापूराया धाव घे रे
मायबापा धाव घे


ह्या कलियुगात जन्मलेला अगदी प्रत्येक मानव हा त्याच्या त्यानेच निर्माण केलेल्या प्रारब्धाच्या ओझ्याने खूपच वाकलेला, दु:खी आणि खंगलेला आहे.

सगळ्यातून सुटका तर हवी आहे. पण आपण सारे सामान्य मानव. षडरिपू खचाखच भरलेले असल्यामुळे मोक्षप्राप्ती ही तर फार दूरची गोष्ट आहे. त्यात वाईट कर्मामुळे भोग भोगायचेच आहेत. 

कथेतील डॉ. पिल्लेही त्यातीलच एक. 


... पण सद्गुरू सोबत असताना, त्याच्या कृपादृष्टीखाली आपला हा प्रवास खूपच सोपा होतो. ह्या जीवनरूपी बाभूळवनीच्या वाटेला मखमली गालिचात रूपांतर करण्याचे सामर्थ्य केवळ ह्या बाबाकडेच ! आणि म्हणूनच बाबा सद्गुरू म्हणून लाभल्यामुळे पिल्ल्यांचा नारू फुटला आणि ते यातनांमधून मुक्त झाले. यासाठीच जीवनात सद्गुरू हवा.    


बाभूळवनीच्या पायवाटी 
गालिचा तू मखमली 
रणरणत्या वाळवंटी 
गरूडपंख सावली 


ह्या कथेतून काही महत्तवाच्या गोष्टी समजल्या. 


१) पिल्ले हे स्वत: एक डॉक्टर असूनही इतके घाबरले आणि कळवळले की त्यांना हे जीवन नकोसे झाले. मग सामान्यांची काय कथा? 

हे प्रारब्ध इतके वाईट आहे की जे एका डॉक्टरलाही रुग्ण बनवू शकते. आणि अशा भोगांतून केवळ हा बाबाच बाहेर काढू शकतो. 


शुभाशुभ दोन्ही नमिती 
कर जोडूनी 
प्रारब्धाच्या विशाल भिंती 
तूचि तोडीसी 


२) हे सात नारू म्हणजे मानवाच्या जीवनातील साडेसाती. संकटांचा चक्रवयुहच. तो भेदायाला साईलीलाच हवी. 


बाबांना चिलीम आणि बिडी ओढायला समोर पिल्लेच लागत. असे करून ह्या बाबाने त्यांचे प्रारब्ध नारू होण्याआधीच आधीच जाळले होते. त्यांच्या भोगांची तीव्रता खूपच कमी केली होती. नाहीतर पिल्लेना हा नारू जाम भारी पडला असता.          


३) डॉ. पिल्ल्यांचा बाबांवर अगदी अनन्य विश्वास आहे. इतके सगळे सहन करीत असतानाही त्यांच्या मुखी साईनाम होते.

ह्या नामाच्या प्रभावामुळेच नारुची घाण फुटून बाहेर येऊ शकली.  


अनिरुद्ध नामे घालता कवच 
घाण सांग कोठुनी कैसी येई   

पिपा म्हणे माझा अनिरुद्ध निश्चय 
त्याच्यावीण शुद्ध कोण करी 


खूपच शिकण्यासारखे आहे यातून. जरा जरी मनाविरुद्ध झाले की आपला मात्र विश्वास डळमळीत होतो आणि देवा तू असे का केलेस असे म्हणून 'त्या'ला लगेच नावे ठेवायला आपण पुढे असतो.   


४) "देवा मी कधीच कुणाला त्रास दिला नाही, सगळ्यांशी चांगले वागलो, मग असे कसे काय झाले ?" असा आपल्या सर्वांचाच आवडीचा प्रश्न असतो. 

पण आधीच्या जन्मात आपण काय करून ठेवले आहे हे केवळ हा बाबाच जाणतो. आपण नाही. म्हणूनच अशा प्रश्नाला काहीच अर्थ नाही. 

होते सार्थक जीवाचे 
मिळे सामर्थ्य मनाचे 
टळे पारब्ध कर्माचे 
बापू बोल बापू बोल 


आजारामध्ये निराश झालेल्या आपल्या मनाला केवळ हा बाबाच समजून घेऊ शकतो. मानवाची ताकद मर्यादित आहे हे जाणून हा बाबा स्वतःचे सहाय्य आणि सामर्थ्य त्यात मिसळून कमकुवत मनाला बळकटी देतो. 

जीवनाची भूमी जरी 
जाहली उजाड 
ह्याने नदी पाठविली 
फोडुनी पहाड 


५) मानवाचे मन त्याची सारी शक्ती नष्ट करून टाकते. जीवनात नैराश्य आणते. तेव्हाच मानवाला जीवन नकोसे वाटू लागते. पण हा माझा बापूसाई मन:सामर्थ्यदाता आहे. 


धुवाया इंद्रिय सारवाया मन
व्हावया स्वछ दारी आलो


शरीराच्या असाध्य रोगाने मानव आधीच खंगलेला असतो. अशा वेळेस त्याचे मन जर strong असेल, तर अशक्याचेही शक्य होऊ शकते. अर्धी लढाई तो तिथेच जिंकतो. म्हणूनच बाबानी त्यांच्या धीराच्या आणि आश्वासक शब्दांनी पिल्ल्याना आधार दिला आहे. 


माझा बापू बापू हा आसरा 
जेव्हा जीव होई घाबरा


६) हा बाबा भक्तांचे पर्वताएवढे प्रारब्ध राईएवढे करतो. ते भोग भोगू शकतील एवढी ताकद पुरवतो. सारी काही व्यवस्था करतो. आपल्यावर इतके प्रेम केवळ हा बाबाच करू शकतो. म्हणूनच दहा जन्माचे प्रारब्ध केवळ दहा दिवसांवर आणून ठेवतो.  


स्पर्श ह्याच्या दृष्टीचा 
गदगद हलवी प्रारब्धा


७) मानवाला भोग हे भोगावेच लागतात. पण सद्गुरू छायेमध्ये सारेच गणित वेगळे. आपल्या पानात काय वाढायचं, काय उचित हे आपल्यापेक्षा हा बाबाच जाणतो.          

बघायला गेलं तर बाबा पिल्लेंना ताबडतोब मुक्ती देऊ शकलेही असते. परंतु त्यांच्यासाठी त्यांच्या नाथसंविध नुसार जे उचित आहे तेच बाबांनी त्यांना सांगितले. 


८) आपल्या भक्तांना दुःखी बघून ह्याला खूप वाईट वाटते. प्रत्येकाला सुख शांती देण्यासाठी तर हा खाली येतो. 

भक्ताश्रू पाहताच मन तुझे आक्रंदे
हळव्या जिवलगांना भावणारा 
भक्तिवेड्या पामरांना तारणारा ... 


बाबा पिल्लेना भोग भोगायचे हे प्रेमाने समजाववून सांगताना स्वतः त्यांच्याबरोबरीने समर्थपणे उभा आहे. या नारूविरुद्धच्या लढाईत तो भक्ताच्या पाठीच नाही, तर त्याच्यासमोर खंबीरपणे सक्षमतेने तयार आहे.       


९) बाबानी खुद्द स्वतःचा तक्या डॉकटर पिल्लेना आराम पडावा म्हणून दिला आहे. हा तक्या म्हणजेच बाबांचा विसावा. हीच ती मशीदमाईची छाया.  


हीच आपुली द्वारकामाता । 
मशिदीचे या अंकीं बैसतां । 
लेंकुरां देई ती निर्भयता ।
चिंतेची वार्ता नुरेचि ॥४८॥

मोठी कृपाळू ही मशीदमाई ।
* भोळ्या भाविकांची ही आई ।* 
कोणी कसाही पडो अपायीं । 
करील ही ठायींच रक्षण ॥४९॥

मग असे असताना पिल्लेना कशाला चिंता करायला हवी ? नाही का ? 


१०) इतके सारे मिळूनही पिल्लेंची तक्रार करणे सुरूच आहे. नानांनी नारूवर बांधलेल्या पट्टीने आराम पडत नाही असा जयघोष चालू आहे.

पुढे नारू फुटला तरी बाबांच्या म्हणण्यानुसार कावळा कुठे आहे ज्याने टोचा मारल्यावर नारू बरा होणार आहे हेच पाहात आहेत.

 सबुरी संपल्यावर प्रत्येक मानव असाच हतबल होतो.     


११) बाबांच्या planning ला मनापासून सलाम ! आधी पिल्लेना पाय लांब करायला सांगितले. पुढे त्यावरच अब्दुलचा पाय पडला. बाबांची खेळी अगदीच अगाध ! परिस्थितीला वाकवून हवे ते घडवून आणतो हा बाबा ! 


नुसते कुथत पडून राहण्यापेक्षा एकदाच मोठी कळ येऊन नारू फुटून बाहेर येणे हे खूपच चांगले. बाबांनी अगदी बरोबर टायमिंग साधले. ग्रेट ! बाबा पिल्लेंचा नारू कसाही बरा करू शकले असते. 

पण पिल्लेना मशीदमाईची आणि बाबांची स्पंदने प्राप्त व्हावीत यासाठी बाबांनी त्यांना आपल्या जवळच बोलावून घेतले.   


शेवटी एवढेच वाटते. 


There is no sorrow on this Earth that the Heavens cannot solve! ...

...and for all of us, being His children, our Heaven is here, at the lotus feet of Sadguru Aniruddha Bapu, Nandai and Suchitdada.   


Love you Dad Mom Dada





--------------------------




बापाजी कथा 



काही वर्षांपूर्वी रिलीज झालेला शुभमंगल सावधान हा मराठी सिनेमा पुन्हा पाहण्याचा योग्य आला. एक कट्टर विठ्ठलभक्त (मुलीची आत्या) आणि देवावर अजिबात विश्वास नसलेली व्यक्ती (मुलीची सासू) जेव्हा एकत्र नात्यामधे बांधली जाते, तेव्हा काय होईल हे या चित्रपटात दाखवले आहे. शेवटी सारी मतमतांतरे आणि त्यावर होणारी भांडणे यामध्ये ती गरोदर मुलगी जिन्यावरून गडगडत खाली पडते. सहाजिकच रागावून ती नास्तिक सासू भडकते आणि विठ्ठलाची मुर्ती देव्हाऱ्यातून काढून जमिनीवर ठेवते.  

केवळ विज्ञानावरच विश्वास असल्याने डॉकटर आणि डॉक्टरांच्या ताकदीवरच पूरा भरवसा होता. मुलीची आत्या मात्र सतत विठ्ठलाचा धावा करीत होती. शेवटी डॉकटर त्यांच्या तोंडानेच म्हणाले. "आम्ही शेवटी मानवच आहोत. देव नाही". हे एकच वाक्य त्या मुलीच्या नास्तिक सासूला बरेच काही सांगून आणि शिकवून गेले. तिचा कायापालट झाला. विठ्ठलाची ताकद विज्ञानापेक्षाही किती अफाट आहे याचा अंदाज आला. 

हे सारे सांगायचा उद्देश एकच. कथेत माधवराव ज्या विश्वासाने ग्रंथीज्वरावर औषध केवळ बाबा आणि त्यांची उदी हेच सांगत आहेत तोच विश्वास कसा महत्तवाचा याची जाणीव आपल्याला होते. त्या विश्वासामुळेच उदी, जी संजीवनी आहे तिने काय चमत्कार केला नाही बघा ! जी बाई ग्रन्थिज्वराने, अशक्तपणाने, वेदनेने, तापाने आदल्या दिवशी कुढत होती तीच बाई चक्क बाबांची उदी आशीर्वाद घेतल्यावर चुलीवर चहा टाकत होती !! खरेच अप्रतिम ! हा बाबा काय नाही करू शकत सांगा ! औषध आणि बाबांची कृपा असल्यावर कोणता आजार बरा होऊ शकणार नाही ?  

हल्ली काही लोक हे असे ऐकून हसतात. उदीने काय होणार ? असे कधी होते का ? वैगरे प्रश्नांची सरबत्ती करताना दिसतात. अशा साऱ्या लोकाना ही कथा म्हणजे एक चोख उत्तर आहे असे वाटते. 

माधवरावांच्या बाबावरच्या प्रेमालाही खरोखर सलाम ! अगदी छोट्यातली छोटी गोष्ट का असेना, बाबांचे मत घेत आहेत. आपण ज्याप्रकारे काहीही जरी झाले तरी सूचितदादांकडे धाव घेतो, तसेच माधवरावांनी धाव घेतली आहे. मुख्य मुद्दा म्हणजे काहीतरी वाईट झाले म्हणून नाही, तर काहीतरी चांगले झाल्यावरही ते बाबांकडे जायचेच.        

बापाजींना माधवरावांचा मोठा आधार होता. एक भाऊ म्हणून आणि बाबांचा जवळचा भक्त म्हणून. स्वपत्नी अशी आजारी झाल्यावर कुणाचीही भीतीने गाळण उडेल. बाबानी माधवरावांना पुढच्या दिवशी सकाळी बापाजींच्या घरी जायला सांगितले म्हणून बापाजी निराश झाले. जर बाबांच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवला असता, तर घाबरण्याची काहीच गरज नसती. पण सामान्य माणसाचे मन. घाबरणारच. परंतु माधवराव घाबरलेले दिसत नाहीत. बाबा जे काही करतील ते उचितच असेल, हा त्यांना पूर्ण विश्वास होता. माधवरावांनी बाबांची आज्ञा तंतोतंत पाळली. 

देव तारी त्याला कोण मारी ? बाबांना बापाजींच्या पत्नीला वाचवायचेच होते. अगदी आश्चर्यकारकरित्या बाबांनी तिला वाचवले आहे. माधवराव सुद्धा शेवटी एक मानवच आहेत. वाहिनीला असा आजार झाल्यावर त्यांचेही मन तिथे गुंतलेले आहे. तिथे जाईपरेंत त्यांनाही मनाला स्वस्थता नाही. त्यात बाबांचे शब्द ऐकल्यावर तर ते आणखीन घाबरले. बाबांनी खरी हिंट दिली आहे, पण त्यांना ते समजलेच नाही. त्या काळी फोन नव्हते. लगेच फोन करून माधवरावांना कळवलं असं होत नसे. बापाजींसारखे पुढे माधवरावही आश्चर्याने आणि साईप्रेमाने हळवे झाले. 

पुढे बाबांना सांगितल्यावर बाबानेही सारे काही करून त्याचे क्रेडिट स्वतःकडे कणभरही घेतले नाही. आपण मात्र स्वतःचेच काय, तर दुसऱ्याचे क्रेडिटही स्वतःच्या खिशात घालू पाहातो. हा साई वेगळाच आहे. खूप काही शिकवून जातो. 

शेवटी एवढेच वाटते. हा बाबा अगदी प्रत्येकाचीच काळजी वाहात असतो. त्यासाठी शिरडी सोडून त्याला कुठेही जाण्याची गरज नसते. तो आहेच. आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेऊन वहिवाट चालूया ... 


पिपा म्हणे माझी 
कोरी ढोर वाट 
तू माझा गुराखी 
मी ढोर रे ...  



--------------------------



इराण्याच्या मुलीची आकडी येण्याची कथा
वृद्ध गृहस्थाची मूतखड्याची कथा 
प्रभू कायस्थ जातीच्या गृहस्थाची कथा  
 



ह्यातील प्रत्येक कथा उदीचा महिमा सांगते. प्रत्येकाचा भावार्थ जवळपास सारखाच आहे. उदी विषयी प्रॅक्टिकल बुक मध्ये प्रयोग आहे. प्रिझम चा. तो जरूर वाचावा. त्याने उदी म्हणजे काय हे अधिक स्पष्ट होईल.

फक्त प्रभू कायस्थ जातीच्या व्यक्तीच्या कथेत एक महत्तवाचा मुद्दा जाणवतो तो म्हणजे साईवरील प्रचंड विश्वास. जे जे म्हणून घडते ते ते सारे ह्या बाबाच्या इच्छेनेच घडून येते. कमालीचा पॉझिटीव्ह attitude ह्या कथेत दिसून येतो. मूल जरी गेले तरीही ती बाई जिवंत आहे यात समाधान मानलेले दिसते. खूप मोठी गोष्ट आहे. मूल गेल्याचे काय प्रचंड दुःख असू शकते ह्याचा अंदाजही न केलेला बरा. ते त्या बाईच्या वाट्याला आले. परंतु तरीही त्यांचा बाबांवरचा विश्वास ढळला नाही. 

इथे काही कुजके आणि श्रद्धाहीन लोक मुद्दाम खोट काढू शकतात. उदी लावूनही असे झालेच कसे ? मग उदी कशाला लावायची ? त्याचा फायदा तरी काय ? अशी लोक बरोबर संधी साधून बाबांना कसे बोलता येईल याचीच मुद्दाम वाट पाहात असतात. त्यांच्याविषयी इतरांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. परंतु इथेच खऱ्या भक्तांची परीक्षा असते. 

हा बाबा कधीच कुणाचेच वाईट करीत नाही. भोग हे प्रत्येकालाच भोगावेच लागतात. अगदी त्या परमात्म्यालाही ते चुकले नाहीत. शेवटी आपल्याच कर्माची ती फळे असतात. परंतु बाबा आणि त्याची उदी यांचे कवच असल्यामुळे किमान त्या बाळाच्या आईचा तरी जीव वाचला. खूप काही शिकण्यासारखे आहे या कथेत.  

कुणी म्हणेल बाळ का गेले ? त्याला कसले पाप ? परंतु याचे उत्तर आज आपण बापूंकडे येतो म्हणून आपल्याला ठाऊक आहे. प्रत्येक जीव आधीच्या दोन जन्माचे पाप आणि पुण्य घेऊन येतो. त्या बाळाला मानवाचा जन्म मिळाला खरा; पण प्रारब्धामुळे त्याचा उचित उपयोग त्याला करता आला नाही. कुणास ठाऊक, त्याच मातेच्या पोटी त्याचा पुन्हा जन्मही होऊ शकेल ? ह्या साईची लीला अगाध आहे. खरेच. 

ह्या बाबावरच्या विश्वासामुळे तर त्या मातेच्या आयुष्यात पुढे कदाचित अनेक चमत्कार होऊ सुद्धा शकतील. त्याचेही फळ तिला नक्की मिळेल. परंतु पुन्हा एकदा त्या मातेला सॅल्यूट ! खरोखर सलाम !                            




















0 comments: