Adhyay 12 (अध्याय १२)

08:15:00 Nandan Bhalwankar 0 Comments


हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 


काका महाजनी कथा 
(मनात ८ दिवस शिरडीत राहायचे होते -> बाबांनी लगेच जायला सांगितले) 

आणि 

धुमाळ वकील कथा 
(उभ्या उभ्या दर्शन घेण्याचे मनात होते -> बाबानी काही महिने शिरडीत ठेऊन घेतले)


किती विरोधाभास आहे बघा दोन कथांमध्ये. ज्याला शिरडीत राहायचे आहे त्याला लगेच निघायला सांगितले तर ज्याला लगेच निघायचे आहे त्याला ठेऊन घेतले. वाचताना मनात येऊ शकते. असे कसे हे साईबाबा? एकीकडे आपण म्हणतो की साईनाथ भक्तांच्या मनातले ओळखतात आणि त्यांची इच्छा पुरवतात. मग असे का ? सामान्य मानवाच्या मनात प्रश्न पडतो. पण याचे उत्तर बापूंनी आधीच दिले आहे. 

हा साईनाथ जे काही भक्त मागतो, ते जर त्या भक्तासाठी अनुचित असेल, तर तो ते अजिबात पुरवत नाही. मग आपण कितीही जरी थयथयाट केला तरीही तो ते पुरवीत नाही. 

बापू म्हणतात लहान मुलाने समजा रॉकेल प्यायला मागितले तर त्याची आई देईल का ? त्याच्या ते हिताचे नाही हे त्या आईला समजत असते. पण हे त्या मुलाला कळत नसल्याने तो आईवर रुसतो, रागावतो आणि आईलाच दोष देतो. तरीही आई आपल्या भूमिकेवर ठाम राहते, आणि किंबहुना राहायलाच हवे. रॉकेल जर मुलगा प्यायला तर पुढे काय होईल ते आई जाणत असते, पण मुलगा अज्ञानी असतो. तो आईच्याच विरुद्ध जाऊन ती गोष्ट प्यायला बघतो. पण शेवटपरेंत आई त्याला हवी असणारी चुकीची गोष्ट त्याच्या हाती लागू देत नाही. 

हे करण्यामागे तिचे प्रेमच दडलेलं असतं आणि हेच तो अभागी मुलगा ओळखू शकत नाही. आपणही ह्या मुलाप्रमाणेच वागत असतो. माझी इच्छा झाली म्हणजे ती गोष्ट मला मिळायलाच हवी ह्याच हट्टापुढे आपण आपलेच नुकसान करत असतो. 

बाबा ज्याअर्थी कुठली गोष्ट करायाला नाही असे म्हणत आहेत किंवा एखादी गोष्ट करायला सांगत आहेत म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी important आहे हे आपण जाणायला हवे. हा साईनाथ जे करायला सांगतो ते उचितच असते आणि त्यातच त्या भक्ताचे हीत असते. हा उगाचच काहीही करत नाही. त्यामागे खूप मोठे कारण दडलेलं असतं हे सूज्ञ मानवाने जाणावे. 

तसेच बाबांची आज्ञा मोडल्याचे काय परिणाम होतात हे आपण ९ व्या अध्यायामध्ये जाणतोच. म्हणूनच बाबा जे सांगतात ते ऐकण्यातच खरे शहाणपण. 

पिपा सांगे खास 
बात ह्याची ऐका 
शब्द ह्याचा ऐका 
तोची निका            

शब्द तुझे जरी 

दुरून ऐकले 
नशीब आमुचे 
तरी फळफळलें 

सुरुवातीला बाबा हे का करायला सांगत आहेत, ह्याने काय होणारे असे तर्क लढवून आपण मोकळे होतो. १ ल्या अध्यायात बाबा गहू का दळायला बसले आहेत असा प्रश्न सगळ्यांना पडलेला. पण नंतर सगळ्यांचे डोळे उघडले. सगळे खजील झाले. ह्या गहू दळण्याशी बाबांचा काय संबंध, ते केल्याने आणि त्यांचे ऐकून पीठ गावच्या शिवेवर टाकल्याने काय झाले हे आपण प्रत्येक जण जाणतोच. 

हा बाबा जे करतो तेच उचित आणि बाबा उचित तेच करतो. ते ऐकणे आपल्याच हातात. आणि त्यांचे ऐकण्यातच खरा शहाणपणा. कारण शेवटी मानवाची बुद्धी तोकडी आहे. ती भविष्य जाणत नाही. विचार करण्याची क्षमता आणि प्रगल्भता दोन्हीही अगदी कुणी कितीही हुशार असला तरी बाबांपुढे शुल्लकच. 

हा बाबा at a time सगळीकडे present असल्याकारणाने कुठे कधी काय घडतंय हे बाबांशिवाय कुणाला समजणार ? काका महाजनींच्या मनात शिरडीस राहायचा खूप पवित्र विचार होता. पण तरीही बाबांनी त्यांना परत पाठवले. 

- काकांच्या मनात बाबांवर राग आलेला नाही. 
- बाबांवर पूर्ण विश्वास आहे 
- बाबांच्या मनातले ओळखले आहे आणि त्याप्रमाणे कृती केली 
- बाबांची आज्ञा तंतोतंत पाळली 
- "बाबांनी माझ्या मनातले ओळखलेच नाही, माझा अपमान केला, माझ्या प्रेमाचा अपमान केला, मला असे का बरे वंचित केले? " असे विचार मनाला शिवले नाही. 
- बाबा ज्याअर्थी मला निघायला सांगत आहेत त्याअर्थी त्यात माझेच हीत आहे हे पक्के माहीत आहे. 
- मनात गोकुळाष्टमी उत्सव बघायची खूपच इच्छा आहे. परंतु या पवित्र लोभालाही बाबांच्या इच्छेच्या स्वतःस आड येऊ दिलेले नाही. खरेच सलाम !   

काका महाजनी हे खरोखर श्रेष्ठ भक्त आहेत. मी तिथे असलो असतो तर मला नक्कीच बाबांचा राग आला असता. माझ्या मनात "का?" हा प्रश्न अनेक वेळा येतो. जेव्हा ह्या कथा वाचतो तेव्हा स्वतःलाच एक लस टोचून घेतल्याचे feeling येते.    

ह्या बाबांना जाणून घ्यायला अनेक जन्म कमीच आहेत. हा बाबा म्हणजे एक मोठा महासागर आहे. त्याची discovery करणे या जन्मात तरी शक्य नाही. (त्याच्या कृपेनेच अत्ता कुठे पोहोता यायला लागले आहे. साई नावाच्या महासागरात अजून डुबकी घ्यायची आहे.)

... आणि पुढे काकांना समजलेच ! बाबांनी सुरेख अनुभव दिला आहे. "मी तुला का जायला सांगितले" हे पत्राच्या पुराव्यानिशी दाखवूनही दिलेले आहे.                  

धुमाळ वकिलांची तर कथाच निराळी. साक्षात हा बाबा शिरडीत ठेऊन घेतोय ! किती मोठी गोष्ट आहे ना ! Dhumal is very lucky. केवळ भाग्यवंतांनाच ही संधी प्राप्त होते. 

ही कथा १२ व्या अध्यायात येते. तर २१ व्या अध्यायात एका वकिलाची कथा येते. १२ काय किंवा त्याउलट २१ काय, सगळीकडेच १२ = १ + २ = ३ आणि २ + १ = ३ त्या त्रिविक्रमाच्या ३ पावलांचीच सत्ता.   

धुमाळांना हा साई मला का थांबवून घेतोय हे शेवटीपरेंत समजलेच नाही. आपली अवस्था सुद्धा ही या धुमाळांसारखीच असते. बाबांच्या कृतीचा अर्थ रिझल्ट लागल्याशिवाय समजत नाही. 

वकील म्हंटले की माणूस वादावादी मध्ये पटाईत असतो. लगेच प्रश्नाचं उत्तर शोधायची जिज्ञासा असते. धुमाळांना सुद्धा "साई मला का बरे थांबवून घेत आहेत?" असा सारखा प्रश्न पडला होता. पण प्रत्येक वेळेस बाबांकडून एकच उत्तर मिळत असे. 

शेवटी उत्तर समजलेच. साईनाथाच्या शब्दाचा अर्थ तेव्हा कळला. मुळात आपण हा अर्थ शोधायला जाताच कामा नये. बाबानी जे सांगितले ते करायचेच हाच नियम लावून घ्यायला हवा. बाकी प्रश्न मनात यायलाच नको आणि जरी ते आलेच, तरी बाबावर पूर्ण विश्वास हवा. 

साईनाथांची इच्छा झाली की सगळ्या गोष्टी कशा आपोआप घडवून आणल्या जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कथा. खटला पुढे जाणे, न्यायाधीशाला पोटशूळ होणे (जो त्याला आधी कधीच झाला नव्हता झाला नव्हता) हे सगळं ह्या साईनाथाच्या इच्छेमुळेच. ह्याचा संकल्प झाला की सगळ्या गोष्टी कशा आपोआप घडून येतात... आणि ते घडण्यासाठी ह्या साईनाथाला विशेष असे काही करावे लागत नाही.

कुठलीही गोष्ट successful होण्यासाठी उचित वेळ काय हे फक्त तो बाबाच जाणतो आणि म्हणूनच त्याच्या संकल्पानुसार त्याने धुमाळ ना थांबवून घेतले. इतके दिवस साईसहवास मिळाल्यावर धुमाळ वकिलाचा खटला हरतील असे कसे होईल ? प्रत्येक चांगल्या गोष्टीचा आणि साईसहवास लाभणाऱ्या लाभार्थीच्या कथेचा happy ending होतो अगदी तसेच धुमाळांच्या गोष्टीत पाहायला मिळाले. ही सारी इतक्या दिवसाच्या साईसहवासाची किमया.      

शेवटी एवढेच वाटते. ह्या साईनाथाला कधीही काहीही पालटून टाकायची ताकद आहे. जगातल्या प्रत्येक मानवाची कहाणी आहे. मन आणि बुद्धीचे नेहेमी द्वंद्व सुरूच असते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मानव हा कुठल्या ना कुठल्या खटल्यात उभा असतोच. त्याचवेळी त्याला आधाराची खरी गरज असते. पण इथे ह्या परमेश्वराचे जे लेकरू आहे ते ह्या जीवनाच्या खटल्यात जिंकतेच! कारण त्याचा सारा न्यायनिवाडा हा साईनाथ करत असतो.  

बाभूळवनीच्या पायवाटी गालिचा तू मखमली 
रणरणत्या वाळवंटी गरूडपंख सावली 
असा कसा तूच एक धावणारा 
भक्तिवेड्या पामरांना तारणारा ... 








----------------------------

नानासाहेब निमोणकर यांच्या पत्नीचा अनुभव  



आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात. नक्की काय करावे हे समजत नाही. अशा पेचप्रसंगातून केवळ हा साईनाथच आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतो. 

निमोणकरांच्या पत्नीची पती आणि मुलगा अशा दोन्ही बाजूंनी कोंडी झाली होती. एक आई म्हणून आजारी मुलाकडे मन ओढ घेत होतं तर एकीकडे पतीचा शब्दही प्रमाण होता. काय करावे काहीच सुचत नव्हतं... एक माउली आणि एक पतिव्रता ... 

बाईचं ग कसं जिणं 
चारी बाजू येई शीण 

घालमेल हृदयाची 
सांगते गं प्राणपणे ... 

अशावेळेस अशा कठीण प्रसंगाचे solution हे फक्त साईच देऊ शकतात. किती सहजतेने साईनाथांनी या बाईच्या मनीची व्यथा जाणली आणि त्यातून सहीसलामत मार्ग काढला. साप भी ना मरे और लाठी भी ना टूटे ह्या म्हणीचा अर्थ बाबांनी दाखवून दिला. एका दगडात दोन पक्षी केवळ हा बाबाच मारू शकतो. बाकी कुणाला हे सहज जमणे शक्य नाही. साईनाथांनी बाईच्या मनातली इच्छा पुरी केलीच, शिवाय तिच्या मुलालाही आजारपणात सोबत म्हणून आई मिळाली. तसेच निमोणकरांच्या मनातील भीतीही दूर घालवून दिली.    

ही साईकृपा त्यांच्यावर कशामुळे झाली ? कथेमध्ये ते साईप्रेमात चिंब भिजलेले आणि साईशी well connected होते असे लिहिलेले आहे. आपल्यावर अशी कृपा होण्यासाठी साईंशी अनुसंधान बांधणे खूप गरजेचे असते.   

अशा मनातल्या शंका आणि वादळे साईनाथ अगदी चुटकीसरशी सोडवू शकतो आणि सोडवतो सुद्धा ! हा मन:सामर्थ्यदाता आहे. मनातल्या प्रश्नांचं लगेचच उत्तर देतो. 

... आणि याकरताच आयुष्यात सद्गुरू हवा. 

- पुढे काय येणार आहे आणि आपल्याला नक्की काय करायला हवं हे केवळ तो बाबाच जाणतो. 
- आयुष्यात प्रत्येक क्षणाला आपण युद्ध करत असतो. कधी ते बाहेर असतं तर कधी आतमध्ये. अशा युद्धात हा साईकृष्ण आपल्या सोबत असल्यास विजय आपलाच, नाही का ?
- पेचप्रसंगात नक्की काय करायचं हा प्रत्येकालाच नेहेमीच प्रश्न पडतो. अशा वेळेस प्रत्येक क्षणाचा सोबती हा साईनाथच.     
- आपली आई ज्याप्रमाणे बालकाच्या मनात काय चाललं आहे ते बरोब्बर ओळखते, त्याचप्रमाणे हा साईनाथ भक्तांच्या मनातील सूक्ष्म हाक ऐकून आपण काहीही न सांगता त्याचे solution सुद्धा देतो ! अंबज्ञ !    



----------------------------


अपना तकिया छोडना नहीं | यावर माझे विचार 




योगीन्द्रसिंहांनी हे वाक्य खालील अभंगात आधीच सांगितले आहे.    


बापूपायी ठेवू 
एकविध भाव 
नको धावाधाव 
अन्य कोठें 


बापू नेहेमी सांगतात. "आपला बाप तो आपला बाप." एक तर खरा सद्गुरू लाभणे हे महतभाग्य. म्हणूनच एकदा का सद्गुरूने आपले बोट पकडले, तर आपण ते बोट सोडून दुसरीकडे शोधाशोध करणे म्हणजे समोर गोड्या पाण्याचा तलाव असताना तहान लागल्यावर दुसरा तलाव शोधण्यासाठी वणवण भटकल्याप्रमाणे आहे.    

.... आणि आपण हे असे भटकू नये असेच ही ओवी आपल्याला सांगत आहे. असे भटकावेसे वाटणे हाच आपला  आपल्या सद्गुरूंवरील अविश्वासाचा मुख्य पुरावा आहे.  


जो जो जयाचा गुरु असावा। 
त्याचेचि ठायीं द्दढ विश्वास बसावा । 
अन्यत्र कोठेंही तो नसावा । 
मनीं ठसावा गुह्यार्थ हा ॥१७६॥

कोणाची कीर्ति कितीही असो । 
आपुले गुरूची मुळींही नसो । 
परी स्वगुरु-ठायींच विश्वास वसो । 
हाचि उपदेशो येथिला ॥१७८॥


अध्याय १२ मधील वरील ओव्या आपल्याला बरेच काही सांगून जातात....  साईचरित्रातच वरील ओव्याचा अर्थ सांगणारी बरीच उदाहरणे आपल्याला दिसतील. 


१) 
अध्याय ११ मध्ये वादळी पावसाच्या कथेत सारे शिरडी ग्रामस्थ, पशू पक्षी देखील मशीदामाईच्याच आश्रयाला येतात. दुसरीकडे कुठे जात नाहीत. हा साईबाबाच यातून तारणहार आहे हा अनन्य विश्वास त्यांना होता. 

जोगाई जाखाई मरीआई । 
शनि शंकर अंबाबाई । 
मारुति खंडोबा म्हाळसाई । 
ठायीं ठायीं शिरडींत ॥१२२॥

परी अवघड प्रसंग येतां । 
कामीं पडेना एकही ग्रामस्था । 
तयांचा तो चालता बोलता धांवता । 
संकटीं पावता एक साई ॥१२३॥

२) 
शाम्याला सर्पदंश झालेला असताना तो केवळ साईबाकडेच गेला. कुठचेही संकट येउदे, उपाय केवळ हा साईच आहे, हा त्याचा ठाम विश्वास होता. साईबाबानी चल नीघ बोलल्यावरही त्याने मशिदीची पायरी सोडली नाही. 

शाम्याने आपला तकिया सोडला नाही. शाम्याची ही कथा वरील ओवीचे जागते उदाहरणच म्हणावे लागेल.   
       
शेवटी एवढेच वाटते -    

नको येरझारा 
बहूमूर्ती पाशी
अनिरुद्ध एकचि 
भार वाहे 


हेच या ओवीचे गमक आहे. 




----------------------------



मुळे शास्त्री कथा 




बघायला गेलं तर प्रत्येक माणूस स्वतःलाच सगळे येते आणि कळते अशा अविर्भावात वावरत असतो. स्वत:च्याच कोषात असतो. त्यात कोण्या एका विषयात जर प्राविण्य मिळवले असेल तर मग बघायलाच नको. आपोआपच आपण स्वतः ला ग्रेट समजायला लागतो. मग आपली एवढी मजल जाते की आपण या विश्वाच्या राजा परमात्म्यालाही "एक साधा माणूस" म्हणूनच पाहातो. पण असे असूनही तो परमात्मा रागावत नाही, तर आपल्याला समजून घेऊन आपली गाडी रुळावर आणतो आणि मग आपली बुद्धी ताळ्यावर येते. 

मुळे शास्त्री हे - 
१) षटशास्त्रचतुर 
२) ज्योतिषशास्त्रात अतिप्रवीण 
३) सामुद्रिकात अतिपारंगत 
होते.  

यावरूनच मुळ्यांच्या डोक्यात हवा जाणे अगदी स्वाभाविकच होते. असे पारंगत असताना मुळ्यांच्या जागी इतर जरी कुणी असले असते तरी त्यालाही थोडा का होईना अहंकार शिवलाच असता.    

बुट्टीच्या परिचयातील हे गृहस्थ म्हणजे साईबाबा कोण आहेत हे नक्की माहितीच असणार. बाबांकडे हवशे, नवशे, गवशे सारे येत. बाबांच्या दर्शनाची इच्छा झाली आणि मुळे निघाले. मूळ्यांच्या मनात झालेली साईदर्शनाची इच्छा म्हणजे बाबांनीच त्यांना आपल्याकडे खेचायची केलेली योजना होती. पण मुळ्यांनी एक योग्य पाऊल उचलले आणि बाबा पुढील ९९ पाऊले स्वतः त्यांच्यासाठी "चालले".  

पुढे फळे विकायला आलेल्या माळिणीच्या वेळेस बाबांनी भक्तांना दिलेल्या प्रत्येक फळाचा अर्थ योगिंद्रसिंहांनी खूपच चांगला समजावून सांगितला आहे. तो जरूर वाचावा. त्याद्वारे भावार्थ अधिक स्पष्ट होईल. 

मुळ्यांना फळाचा प्रसाद द्यावा अशी जरी विनंती केली तरी बाबांनी प्रथम लगेच प्रसाद दिला नाही. आपल्या मनात नक्की काय चालू आहे हे केवळ हा बाबाच जाणतो. मुळ्यांना बाबांविषयी कुतूहल होते. त्यामुळेच त्यांचा हात बघावा / तपासावा अशी त्यांना इच्छा झाली. बाबा म्हणजे नक्की कोण आहेत हे माहिती असूनही त्यांनी बाबांकडे त्यांचा हात मागितला.           

वैनी म्हणे डोळा राही
इतुका लहान 
विश्व व्यापूनिया उरे               
इतुका महान 

उभा भूमीवरी जरी 
हात पोचती ब्रह्मांडी... 

हा बाबा आपल्याला "एक माणूस" म्हणून जरी आपल्याला दिसत असला, तरी तो परमात्मा आहे, ह्या ब्रह्मांडाचा स्वामी आहे हे विसरता कामा नये. आपण ह्याच्यापुढे नगण्यच. त्यामुळे आपण आपल्या पायरीतच राहावे. मुळे हेच विसरले. म्हणूनच त्यांची त्यांना चूक उमगावी यासाठीच बाबांनी त्यांना पहिल्यांदी प्रसाद दिला नाही. 

जो परमात्मा मानवाच्या हाताच्या रेषाही बदलू शकतो, त्या परमात्म्याचा हात वाचायची आपली पात्रता तरी आहे का ? आणि समजा जरी त्याचा हात वाचण्याचे जरी कुणी ठरवलेच, तरी सामान्य मानवाला तो वाचता येऊ शकणार आहे का ? 

हा तोच हात आहे, ज्याच्या आशीर्वादाने अख्खे जीवन पालटू शकते... नव्हत्याचे होते होऊ शकते. हा तोच हात आहे ज्याने लोहारणीच्या मुलीला वाचवायला धुनीत हात घातला, रामनवमीला उकळत्या हंडीत हात घालून हंडिप्रसाद उपलब्ध करून दिला. 

याचा हस्त शिरावरी 
कैसी उरेल आता भीती 

असा हात आपण कितीही जरी पारंगत का असेना बघू शकू काय ? ह्या परमात्म्याला ओळखायला कित्ती जन्म करी घेतले तरी ते कमीच पडतील. मग ह्याचे सामुद्रिक बघणे पेलणार तरी आहे का ? 

पण तरीही हा आपल्याला समजून घेतो. आणि म्हणूनच मुळ्यांना बाबांनी शेवटी ४ केळी प्रसाद स्वरूपात दिली. हे त्याचे प्रेम आणि त्याचा मोठेपणा. ह्या चार केळ्यांच्या स्वरूपात मुळ्यांना बाबांनी आहार, विहार, आचार, विचार प्रदान केले. त्यांना शुद्ध केले. 

मुळ्यांना पूजा अर्चा, सोवळे, ब्राह्मण आदीचा ताठा होता. मशीद ही त्यांना अपवित्र वाटत होती. अग्निहोत्राच्या विधीस सुरुवात केल्यावर बाबांनी दक्षिणा मागितली असल्याचा निरोप आला. पण तरीही त्यांच्या डोक्यात बाबांविषयी संशयाचे शंकांचे जाळे असल्याने जावे की न जावे हा प्रश्न पडला. मनात संशय आला की असे नानाविध प्रश्न पडतातच आणि त्यात माणूस पुरता अडकत जातो. 

मुळ्यांच्या डोक्यावर "आपण कुणीतरी श्रेष्ठ असल्याचे" नसते ओझे होते. हा मोठेपणा म्हणजे एक "ओझेच" असते, जे आपण आपल्या डोक्यावर घेऊन मिरवत असतो. खरे पाहाता त्याचा मानवाला काहीच उपयोग नसतो, पण तरीही अगदी गर्वाने ते मिरवत असतो. का? माहीत नाही. 
       
बाबांनी मुळ्यांकडून हा दक्षिणारुपी हे फुकाचे ओझेच मागितले. ते ही मुळ्यांना समजले नाही. बाबांनी एवढे लघुरूप घेऊनसुद्धा मुळे मात्र त्यांच्या "विशाल" रूपातच अजून आहेत.   

अनिरुद्ध येता अवघा 
जाळे कापत राहिला 
ओझे माझे घेऊनिया 
मला म्हणे बा लेकरा ... 

बघा, केवढे प्रेम आहे ना बाबांचे आपल्या प्रत्येकावर ! हा बरोब्बर प्रत्येकालाच लाईनीला लावत असतो. बाबा हेच घोलपनाथ. हे सद्गुरुतत्व हे "एक" आहे. सबका मालिक एक. भेद हे मानवाने केले. साईनाथांनी मुळ्यांचे डोळे उघडले. ते पुरते खजील झाले. पवित्रता-अपवित्रता, ब्राह्मण-मुसलीम, सोवळे-ओवळे वैगरे सारे भेद, संशयाच्या शंकांच्या भिंती त्या क्षणी कोसळल्या... उरले ते फक्त भक्त आणि गुरूतील प्रेमाचं नातं... 

साईनाथांनी घोलप गुरूंना सोडून माझ्याकडे ये असे कधीच सांगीतले नाही. किंबहुना त्यांची घोलपभक्तीच दृढ केली. खरेच ग्रेट ! शेवटी सद्गुरुतत्व, तो त्रिविक्रम हे एकच आहे. मुळ्यांनी देखील साईना घोलप मानूनच त्यांची आरती केली आहे. घोलप स्वामींना ती पोचलीच. 

सर्व दव नमस्कारम 
केशवं प्रतिगच्छति 

... आणि मुळे ताळ्यावर आले. सारी प्रतिष्ठा, मान हा साईचरणी वाहून धन्य झाले. हा बाबा आहेच तसा... त्याच्या लीला अगाध !

गर्व अहंकार सोडा हो तुम्ही 
विठ्ठल सोयरा जोडा 

मी तू पण गेले वाया 
पाहता पंढरीच्या राया ... 

मला सुद्धा बापूंनी मस्त अनुभव दिला होता. स्वामी समर्थाना मनात सांगीतलेली गोष्ट प्रवचनात बापूंनी सांगितली. अंगावर काटा आलेला त्यावेळी... स्वामींच्या मठात मी मनात बोललेलं स्वामींनीच ऐकलं नाही, तर बापूंपर्यंत सुद्धा पोहोचलं ! 

बापू साईनाथ स्वामी तो समर्थ 
तोच एक नाथ अनाथांचा 
दवारकामाईत होता जो राहात 
शिरडीचा संत अनिरुद्ध                                                 




     ----------------------------




रामोपासक डॉक्टरांची कथा 

       
सद्गुरू लाभणे ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे.. नक्कीच. प्रत्येकालाच आपल्या गुरूविषयी आदर, प्रेम असतोच. किंबहुना असायलाच हवा. पण काही भक्त "मी माझे गुरू सोडून बाकी कुठल्याही गुरूना (उचित सद्गुरुंना सुद्धा) नमस्कार करणार नाही, तिथे बघणारही नाही" असे छाती पुढे काढून सांगतात. असे करण्यामागे आपल्या सद्गुरूंविषयी प्रेम आणि attachment जरी असली, तरी असे करणे म्हणजे "सद्गुरुतत्व हे एक आहे" हेच आपल्याला माहीत नाही. नाही का ?  

मी देखील पूर्वी म्हणायचो "मी आता बापूंकडे जातो तर मी स्वामींना नमस्कार करणार नाही, गल्लीच्या टोकाला असलेल्या मठातही जाणार नाही". आता हे वाचून माझेच मला हसायला आले. किती वेड्यासारखे करत होतो मी हे आता जाणवत आहे. स्वामी, साई, बापू, हे सद्गुरुतत्व एकच आहे हेच आपल्याला समजून घ्यायला हवे. 

"अपना तकिया छोडना नही" हे जरी खरे असले, तरी आपले सद्गुरू असताना दुसऱ्या  उचित दैवताला नमस्कार करणे म्हणजे आपला तकिया सोडला असे होत नाही. खरे सद्गुरूही असे कधीच सांगणार नाहीत. मुळात साईनाथ आणि श्रीराम हे एकच आहेत हेच डॉक्टर समजू शकले नाहीत.  

ह्या परमात्म्याला, ह्या सद्गुरूला जात-पात धर्म apply होऊच शकत नाही... त्या सगळ्यापलीकडे तो आहे. जात-पात वैगरे भेद हे मानवाने बनवले. त्यामुळे तो या धरणीवर येताना कुठल्याही रूपात येऊ शकतो. आपण फक्त आपला "मीपणा" बाजूला ठेऊन त्याला ओळखायला हवे. डॉक्टर हिंदू मुसलमान या तराजूत साईनाथाना तोलून पाहू लागले. रामावर सच्ची श्रद्धा होती म्हणूनच मी साईनाथांच्या (एका मुसलमान गुरूच्या) पाया पडणार नाही असे म्हणाले. पण त्या साईरामाने लीला केलीच. खरा सद्गुरू माझ्या मागे लागा, माझ्या पाया पडा असे कधीच सांगत नाही. तसेच तशी जबरदस्तीही करायला सांगत नाही. त्या साईलीलेने भले भले गार पडतात. 'त्या'च्या समोर उभं राहिल्यावर सारेच विसरायला होते.     

डॉक्टर श्रीरामांशी केवढे connected असतील ना ! चक्क रामाचे याची देही याचि डोळा दर्शन मिळणे खूपच भाग्याचे लक्षण आहे. केवळ कट्टर भक्तालाच ही संधी मिळू शकते. डॉक्टरांची श्रीरामावर एवढी निष्ठा होती म्हणूनच ते साईनाथांकडे येऊ शकले आणि रामाने त्यांना सद्य युगातील आपल्याच साई रूपाकडे नेले. इथेही साईनाथांनी त्यांची रामभक्तीच दृढ केली आहे. 

मी तू पण गेले वाया 
पाहता पंढरीच्या राया 
अवघा रंग एक झाला .... 

साईनाथांमध्ये रामास पाहून डॉक्टरांचे भानच हरपले. ही आहे त्याच्या लीलेची जादू.  रामाने डॉक्टरांचे बोट धरून अलगद साईनाथाचरणी वाहिले आहे. तसेच "सर्व देव नमस्कारं केशव प्रतिगच्छति" ह्याची शिकवण दिली. सबका मलिक एक, हा त्रिविक्रम एकच आहे... त्याचीच सारी रूपे ही गोष्ट शेवटी डॉक्टरांनी अनुभवली आणि त्यांना पूर्ण पालटवले. ही आहे त्या साईरामाची ताकद. आपण स्वतःस विसरून त्या साईरामचरणी कधी जातो तेच समजत नाही. हा आपल्याला त्याच्याकडे कधी खेचून घेतो हे कळतही नाही..  हेच ते मन: चे नमः होणे. 

प्रथम पाहिले तुला 
आकर्ण नयन फाकले 
रोखून तू पाहता 
सर्व भान हरपले 

एकदा का ह्या साईनाथाने आपल्याला त्याच्याकडे खेचून घेतले, की अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतात. डॉक्टरांचा जुना मित्र अगदी अचानकपणे त्यांना भेटला. ते ही चक्क ९ वर्षांनी. त्याच्याबरोबर डॉक्टर बाबांकडे दुसऱ्या वेळेस गेले आहेत. पहिल्या वेळेस बाबांना नमस्कारही करायला तयार नसलेले डॉक्टर आता साईनाथ नक्की कोण आहेत हे समजल्यावर आता स्वतः बाबांच्या दर्शनाला जात आहेत. 

पण साईनाथ सुद्द्धा त्यांना बोलायचे सोडत नाहीत. डॉक्टरांच्या मनात काय सुरू होते हे त्यांनी पहिल्या वेळीच ओळखले होते. एका बापाप्रमाणे असे बोलून त्यांना चांगलेच खडसावले आहे. डॉक्टरही मनातून चमकले आहेत. पहिल्या वेळी येताना मीपणाच्या कोषात गुरफटून आलेले डॉक्टर आणि आता दुसऱ्यांदा निरभिमानी झालेले, साईप्रेमाने चिंब भिजलेले डॉक्टर यातला फरक एक वाचक म्हणून आपण प्रत्येक जण टिपू शकतो. 

हा साईनाथ खरेच अवलिया आहे. हा एकाच वेळेस अनेक रूपात त्या क्षणी दिसू शकतो. डॉक्तरांना खूपच मोठा अनुभव मिळाला आहे. काय वाटलं असेल ना रामाला बघून त्यांना ! 

ओलेचिंब मन हे झाले 
अंग अंग शहारले 
कातडयातूनी आतुडी 
शिरले प्रेम सावळे ... 

आज बापूमध्येही अनेक जणांना विविध रूपे दिसली आहेत. हा बापू कोण आहे हे Direct समजले. खरेच ग्रेट ! काही जण बापूंकडे आल्यानंतर श्रद्धावान होतात. पण इथे डॉक्टर हे आधीपासून श्रद्धावान आहेत. मग कुणी विचारेल राम असताना साई का हवा ? उत्तर सोपे आहे. 

१) साईनाथानी याद्वारे डॉक्टरांची रामभक्तीच दृढ केली आहे. रामाला भजू नको, मला भज असे म्हंटले नाही. बेसिकली साई आणि रामात भांडण नाही. ते एकच आहेत. रामाला केलेला नमस्कार बाबाला पोचतोच !   
        
२) हेमाडपंतांनी ११ व्या अध्यायात याचे उत्तर दिले आहे. 

न करिता सगुणाचे ध्याना 
भक्तीभाव कदा प्रगटेना  अन सप्रेम जव भक्ती घडेना 
कळी उघडेना मनाची ... 

श्रीराम हे कलियुगात सगुण साकार रूपात साई बनून आले आहेत. निर्गुण रूपातील रामाने त्याच्या सगुण साकार रूपातील साईकडे आपल्या भक्ताला खेचून घेतले आहे. How sweet ! एवढे प्रेम फक्त त्याचेच !

प्रेम देई प्रेम घेई 
हाच एकला करार ....  



















0 comments: