Adhyay 9 (अध्याय ९)

05:36:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 






आज्ञापालन 


या विषयावरच हा अध्याय फोकस करतो. द मोस्ट इंपॉर्टन्ट पॉईंट. लहानपणापासूनच आपण सारेच मनमानी, हट्ट करत असतो. आईचे ऐकत नाही. मला हेच हवे, असेच करायचे आहे यावर आपण अगदी ठाम राहातो. वाटल्यास रुसतो, रडतो, ओरडा सुद्धा खातो, पण स्वतःचा हेका सोडत नाही. आईने जे सांगितले आहे त्याच्या जणू विरुद्ध वागण्याचीच एक वेगळीच मजा असते. पण मग नंतर पडले, लागले की आईच आठवते आणि ती प्रेमळ माउली अगदी सगळे सोडून लेकराच्या जवळ येते, त्याला औषधपाणी करते आणि प्रेमाने समजावते. 

जसजसे आपण मोठे होऊ लागतो, तसतसे आपल्याला 'समज' यायला लागते, शिंग फुटतात... मग तर काय विचारायलाच नको. कुणी काही सांगितलेले आपल्याला बंधन वाटते. आणि हे सारे बंधन मी कधी एकदाचे मोडतो आणि मनमोकळेपणाने मला हवे ते करतो असे होते. 

मातृवात्सल्यविंदानम मध्ये आपण वाचतो. ब्रह्मदेवाला कमळात बसायचे बंधन वाटत होते. त्याला कमळामध्येच बसायची आज्ञा केली होती. पण ती त्याने मोडली आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागलेच. मधू कैटभ मागे लागले. शेवटी तो परमात्मा महाविष्णू आणि मोठी आई महाकालीलाच धावून यायला लागले. Afterall हाच मदतीला धावून येतो. बाकी कुणीच नाही, कारण कुणामध्येच एवढी ताकद नाही. 

आपले मनही या ब्रह्मदेवाप्रमाणेच चंचलतेने वागत असते.  आपल्याला मला हवे ते वागायचे असते आणि त्याला विरोध केला म्हणजेच आपल्यावर बंधन घातल्याप्रमाणे वाटते. बेसिकली हे आज्ञापालन आपल्याला नकोच असते. सर्वच मानवांची ही कहाणी असते. हे मी लिहीणारा सुद्धा याला अपवाद नाही. 



 आज्ञापालन का करायचे ?


वर दिलेले ब्रह्मदेवाचे उदाहरण तर आपण वाचलेच. जिथे आज्ञा मोडली तिथे प्रज्ञापराध झालाच, आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतातच. आणि म्हणूनच आपण आज्ञापालन केले पाहिजे. ते जरी एक प्रकारचे बंधन वाटत असले, तरी त्यात आपलेच हीत आहे हेच आपण जाणले पाहिजे. 

खरे तर आपला सर्वात मोठा दुश्मन आपणच. कारणच आपणच आपल्याला हे बंधन मोडून फसवत असतो. काही काळ आपल्याला मोकळे झाल्याचे फीलिंग येऊन खूप आनंद होतोही, पण तो थोडाच काळ टिकतो. मग समोर येतात ते आज्ञा मोडल्याचे परिणाम. या अध्यायात याचाच अगदी प्रत्येक कथेमध्ये प्रत्यय येतो. यातील प्रत्येक कथेचा भावार्थ हाच आहे. 

आज्ञापालन का करायचे हे आता आपण जाणून घेऊ :

१) यात कितीही कष्ट पडले आणि अशा बंधनाचा जरी जाच वाटला, तरी यात आपलेच भले असते, हीत असते. 

पिपा सांगे खास 
बात याची ऐका 
शब्द याचा ऐका 
तोची निका 

शब्द तुझे जरी 
दुरुन ऐकले 
नशीब आमुचे 
तरी फळफळले ..
  
२) आपण सद्गुरूची आज्ञा पाळतोय ही भावना आणि फीलिंग खूपच छान असते. एक वेगळाच प्रकारचा आनंद आणि मानसिक समाधान मिळते 

३) सद्गुरूंची आज्ञा, त्यांचा शब्द हा त्यांचा आपल्या आयुष्यात झालेला प्रवेश. त्यामुळे अनेक उचित बदल घडण्यास सुरूवात होऊन त्यात आपलाच उत्कर्ष असतो. 

४) आपला भक्त आपली आज्ञा पाळत आहे हे पाहून सद्गुरुंना सुद्धा आनंद होतो. आणि 'हा' आपल्यामुळे आनंदी होण्यासारखे सुख या जगात नाही... 

५) वरवर पहाता कधीकधी आपल्याला वाटू शकते की सद्गुरू आपल्याला हे का करायला सांगत आहेत ? हे करून काय होणार ? याच्याशी तर माझा काहीच संबंध नाही ... हे मला जमणार तरी आहे का ? 

पण सद्गुरू जेव्हा आज्ञा देतो तेव्हा त्यात तो आपली ताकद आणि कृपा भरभरून देत असतो. आज्ञा स्वीकारली आणि निभावली म्हणजे आपल्यावर त्याची कृपा झालीच ! मग काय अशक्य ! नाही का ? सगळे काही हाच आपल्याकडून करून घेत असतो. आपल्याला फक्त त्याने सांगितलेल्या मार्गावर चालायचे असते. बाकी सगळं तोच सांभाळून घेत असतो. हे आपण लक्षात ठेवायला हवे.



 आज्ञा कोणाला केली जाते ?



 हा सद्गुरु स्वतः "माझ्याकडेच या ,माझे ऐका, मीच काय तो शहाणा " असे म्हणून   कधीच दवंडी पिटवत नाही. आपण सद्गुरुकडे जाणे ही त्याची गरज नसून माझी गरज आहे, माझ्या उन्नतीचा तो मार्ग आहे हे आधी आपण जाणून घ्यायला हवे. 

जो स्वतःलाच ग्रेट आणि श्रेष्ठ समजतो त्याच्यासमोर हा लघुरूप स्वीकारतो. त्याला हा सद्गुरू काहीच सांगायला जात नाही. सद्गुरूंची आज्ञा मिळणे हे खरोखरीच मोठे भाग्याचे लक्षण आहे. सहजासहजी सद्गुरू असे सांगणे शक्य नाही. भाग्यवंतांनाच असा चान्स मिळतो. 

छत्रपती शिवाजी महाराजांवर मधे एक चित्रपट आलेला पाहिला. त्यांचा प्रत्येक मावळा त्यांचा शब्द झेलण्याकरता अगदी झटत होता. कधी एकदा माझ्या राजाची (शिवरायांची) आज्ञा मिळेल आणि कधी एकदा मी ती पाळतो अशीच त्या मावळ्यांची धडपड होती. शिवरायांकरता आणि स्वराज्याकरता प्राणही देण्यासाठी हे मावळे मागे - पुढे पाहात नसंत. खरोखर सलाम ! हेच आज्ञापालनाचे उत्तम उदाहरण ! 

हा सद्गुरू उगाचच काही कारणाशिवाय कुणालाच आज्ञा देत नाही. त्या त्या वेळेस ती ती आज्ञा पाळणे ही त्या भक्ताची गरज असते. हा सद्गुरुच भविष्य जाणतो आणि तो जे सांगतो हे त्या वेळेस त्या भक्तासाठी उचित असतं. 

तसेच हा परत परत सांगायला जात नाही. साईबाबांचे "सांगू एकदा सांगू दोनदा" हे शब्द याचीच साक्ष देतात . पण तरीही हा लोण्याहूनही मऊ आहे. हा भक्तांची मनस्थिती ओळखतो आणि म्हणूनच वारंवार आपल्या हिताचे सांगायला येतो.. आपण ऐकत नसताना सुद्धा. हेच त्याचे आपल्यावरचे प्रेम !

तरी कसा बापू माझा येतचि राहतो ...

बेसिकली बाबांचा प्रत्येक शब्द ही भक्तांसाठी आज्ञाच असते. आणि ज्यांनी ज्यांनी आज्ञा मोडली, त्या तात्या कोते पाटील, तात्या कोल्हार आणि मुंबईचा मोठा इंग्रज गृहस्थ यांच्या नशिबी काय काय आले हे आपण त्या त्या कथांमधुन वाचतोच. 


आता आपण तर्खडांच्या कथेविषयी अधिक जाणून घेऊ. 






--------------------------



 तर्खडांची कथा ... 






सर्वात पहिल्यांदी नेवैद्याविषयी थोडेसे :


हा भगवंत एखाद्याचा जसा भाव तसा त्याला पावतो. 

जर आपल्याला वाटत असेल की "ही नुसती भगवंताची मूर्ती आहे, ह्यात थोडीच देव राहातो?", तर देव त्यासाठी त्या मूर्तीत कसा बरे असू शकेल? त्याचप्रमाणे जर एखाद्याने "ही नुसती मूर्ती नसून हा प्रत्यक्ष देवच आहे" या भावनेने आपण नैवेद्य अर्पण करत असू तर त्या क्षणी देव तिथे त्या मूर्तीत प्रत्यक्ष येतोच येतो. 

वरील उदाहरणाप्रमाणेच "हा नैवेद्य देव कसा काय खाईल?" असा मनात विचार आला म्हणजेच आपण समजून जावे की "हा देव नसून ही केवळ देवाची मूर्ती आहे" असाच आपला भाव आहे, आणि देव त्यानुसारच फळ देणार. याउलट "देवा मी प्रेमाने तुला मनापासून हा नैवेद्य अर्पण करतोय, पोटभर खा हा ..." असा जर भाव असेल, तर देव तो नैवेद्य संपवतोच आणि तो प्रसन्न होऊन त्याला तृप्तीचा ढेकर येतोच. 

मग कुणी बुद्धीभेद करणारा म्हणेल की बघा, दाखवलेला नैवेद्य तर आहे तसाच आहे, कुठे संपलाय ?  पण हा नैवेद्य म्हणून काय खातो, हे आपण लक्षात घेतले तर साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.   

हा भक्तीचा भुकेला 
ह्याला नैवेद्य प्रेमाचा... 

नैवेद्य अर्पण करताना ज्या भक्तीभावाने आणि प्रेमाने त्या देवाला आळवतो आणि आठवतो तो भाव आणि प्रेमच हा देव ग्रहण करतो.

एखादवेळी हा देव अगदी त्या व्यक्तीने देवाला अर्पण केलेले नैवेद्याचे ताट संपूर्ण ग्रहण करून, किंवा थोडे खाऊन एक सुंदर अनुभवही देऊ शकेल. बाकीचे लोक ह्याला चमत्कार म्हणू शकतील, पण ही प्रेमाची जादू आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे. 

बापू कुबेर प्रीतीचा... 

हा भक्तिप्रेमाचा आणि भावाचाच हावरा आहे. एवढे जरी कळले तरी सगळ्या प्रश्नांची आणि चमत्कारांची उत्तरे मिळतात.          





 ---------------------------



कथा १ : नैवेद्य दाखवायला विसरल्याची कथा 



हावरा हा भक्तिप्रेमा 
विके कवडीमोला ... 

ही कथा वाचल्यावर तर्खडांच्या मुलाच्या मनातील साईप्रेम अगदी प्रकर्षाने जाणवले. तो नुसता नैवेद्य अर्पण करीत नव्हता, तर त्याच्या मनातील साईप्रेम आणि साईविषयी प्रेमळ भाव तो साईचरणी अर्पित होता. खरेच सुंदर ! 

जे काही आहे ते पहिले मी साईना देणार आणि मगच मी खाणार हा सुंदर भाव त्याच्या मनात भरला होता. ... आणि असा भाव असला की साई येणार नाही असे होईल का? ह्या मुलाच्या प्रेमाच्या दोरीने साईनाथाला रोज त्याच्याकडे खेचून आणले होते. हा साई यासाठीच तर आतुरला असतो. 

बापूला माझ्या प्रेमाची तहान 
बापूला माझ्या भक्तीचीच भूक ... 

ह्या साईनाथाला वाढलेले ताट सोन्याचे आहे किंवा ताटात पंचपकवान्न आहेत यापेक्षाही किती प्रेमभावाने ते साईचरणी अर्पण केले आहे हे साईनाथ बघतो. यासाठीच साईनाथ रोज तर्खडांकडे येत होते. आणि रोज तृप्त होत असंत. किती मस्त ना !

फक्त तुझ्या डोळ्यांमध्ये रोज रोज पाहत होतो 
चित्र नव्हे तूचि असशी एवढेच मानत होतो 

तर्खडांचा मुलगा साईनाथांशी कित्ती घट्ट बांधला गेलाय ते समजते. साईनाथ आणि त्यांचा फोटो हे एकच आहेत. हा केवळ फोटो नसून तो साईनाथच आहेत हे त्याला पक्के माहीत आहे. प्रत्यक्ष सगूण रूपातील बाबांना शिरडीत भेटायला जाताना सुद्धा त्याने त्याच्या घरातील साईबाबांच्या छबीसमोर नैवेद्य दाखवायला त्याच्या बाबांना सांगीतले. खरेच ग्रेट ! 

हा नुसता फोटो नसून प्रत्यक्ष साईच माझ्या घरी निवास करीत आहे हे मनात ठसवले आहे. घरातील एका सदस्याप्रमाणे साईनाथाला मानत आहे... आणि त्याप्रमाणे त्यांना दररोज न चुकता नैवेद्य अर्पण करीत आहे. याचप्रमाणे पुढे प्रत्यक्ष साईनाथ समोर असतानासुद्धा त्याचे बाबा त्याच्या घरी नैवेद्य दाखवायला विसरले म्हणून दुख्ख झाल्यामुळे घरी जाऊन नैवेद्य दाखवण्यासाठी पुन्हा साईनाथांचीच आज्ञा घेतात ! केवढे हे प्रेम ! 

मातृवात्सल्यउपनिषद मध्ये सांगितल्यानुसार फोटो मधले दैवताचे रूप हे त्या प्रत्यक्ष दैवताशी जोडलेलेच असते. पंकजसिंह मेहेता यांचा अनुभव याचीच साक्ष देतो. 




साईनाथ सुद्धा म्हणतात ... ज्याला माझी आठवण असते, त्याची मला निरंतर आठवण असते... आणि म्हणूनच साईनाथ अगदी दररोज न चुकता तर्खडांच्या घरी नैवेद्य ग्रहण करायला येत असत.. कित्ती भाग्यवान ना तर्खड !

बाबा तर्खड सुद्धा आपण नैवेद्य दाखवायला विसरलो हे लक्षात आल्यानंतर लग्गेच पानावर उठून पहिल्यांदी नैवेद्य दाखवतात. "आता दाखवायला विसरलोय ना , उद्या दाखवतो.. एका दिवसाने काय होणारे ... " असे बोलत नाहीत. तसेच याचा मनापासून त्यांना दुख्ख आणि पश्चात्ताप सुद्धा होत आहे. तसे त्यांनी लगेच पत्राद्वारे मुलाला कळवले सुद्धा. लपवले नाही आणि खोटेही बोलले नाहीत. कारण  ->

- साईनाथांविषयी मनात खरे प्रेम आहे.     
- मी साईनाथाना नैवेद्य दाखवला नाही तर साईनाथ उपाशी असतील, भुकेलेले असतील याची जाणीव आहे 
- याचा मनापासून खेद वाटत आहे. 
- साईनाथांना सगळं कळतं हे पक्के माहीत आहे  
- स्वत: ची झालेली चूक लपवून ठेवली नाही. ती कबूलही आहे आणि मुलाला लगेच कळवले सुद्धा. 

हा साईबाबा सगळ्याचाच प्रत्यक्ष साक्षीदार. ह्याला सगळ्याचे ज्ञान आहेच. खालील ओव्या याचीच साक्ष देतात 

वांद्रें ग्रामीं हा प्रकार । शिरडी शंभर कोस दूर । 
तात्काळ तेथें पावली खबर । परिसा तैं उद्नार बाबांचे॥१०३॥

भूत - भविष्यवर्तमान । देशकालाद्यनवच्छिन्न । 
महाराजांसी त्रिकालज्ञान । पहा तें प्रमाण प्रत्यक्ष ॥१०४॥

इकडे मुलगा शिरडीस असतां । तेच दिनीं ते समयीं जी वार्ता । 
घडली साईस वंदूं जातां । श्रोतां सावधानता परिसावी ॥१०५॥   

कथेत बाबांचे अनेक गुण दिसून येतात - 

१) बाबांना काही माहीत नाही असे नाही. 

२) काळ-वेळ, जागा याचे कोणतेच बंधन बाबांना नाही 

३) बाबा सगळीकडेच वावरत असतो 

४) हा भक्तांसाठी 'लहान' होतो आणि भक्त जे प्रेमाने अर्पण करतील त्याचा स्वीकार करतो. 

५) ह्याच्याएवढी क्षमा कोणातच नाही. नैवेद्य दाखवला नाही म्हणून कोप धरला नाही. 

६) वास्तविक पाहाता बाबांना काय कमी असणार ? ते कधी उपाशी राहू शकतील का ? हा तर ब्रह्माडाचा राजा आहे. पण तरीही हा भक्तप्रेमाखातर स्वतःला देखील विसरतो. आणि म्हणूनच तर्खड नैवेद्य दाखवायला विसरले म्हणून बाबा सुद्धा उपाशीच राहिले. 

७) ह्याचा प्रांत हा प्रेमाचा. कोणतेच नियम नाहीत. प्रेमाला मर्यादाच नाही. क्षुद्र दैवतांसारखे नाही. नैवेद्य दाखवला नाही तर देव कोपला असे होणे नाही. देवाला घाबरायची गरज नाही. देव हा आपल्याला घाबरवायला बसलेला नाही, तर आपल्याला सांभाळायला आला आहे हे आपल्या मनावर ठसवतो हा साईबाबा !

बघा ... किती प्रेमळ आहे हा बाबा ! हा आपल्यासाठी सगळं काही करतो ... आपल्या घरी यायला अगदी उत्सुक असतो. पण त्याला जसे हवे आहे तसे आपण वागतो का ? ह्याला अपेक्षित भक्तिप्रेमाचा नैवेद्य अर्पण करतो का  ? हे प्रत्येकानेच स्वतःला विचारूया .. 

सकाळी आला उपाशी गेला 
दुपारी आला उपाशी राहिला 
रातीस आला उपाशी निजला 
तरी कसा बापू माझा येतचि राहिला ... 

असे नको व्हायला. हा आपल्याला कित्येक संधी देत असतो, तीनही प्रहरी म्हणजेच भूत, वर्तमान आणि भविष्य हा आपल्यासाठी धावतच असतो, आपल्याला कवेत घ्यायला आसुसलेला असतो. आपणही ह्याला घट्ट पकडूया ना ...           




---------------------------



कथा 2 : साईनाथांची सर्वव्यापकता 


भक्त प्रल्हाद ची कथा आठवते. हिरण्यकश्यपू विचारतो. "कुठे आहे तुझा देव? इथे आहे का ? तिथे आहे का ? " असे करत सगळ्याला लाथा मारायला लागतो. भोळ्या भक्त प्रल्हाद चा हाच भाव आहे की माझा देव अगदी सगळीकडे आहे. सजीवातच काय, तर अगदी निर्जीवातही हा व्यापून उरला आहे.. आणि शेवटी तो परमात्मा नरसिंह रूपात त्या खांबात प्रकटलाच !

तू पक्ष्यात तू प्राण्यात 

सर्वांच्या हृदयात 
चेतन तूचि अचेतन तूचि 
तू अवघ्या विश्वात 

हा साईनाथ अगदी चराचराला व्यापून उरलेला आहे याचाच दाखला जणू साईनाथ देत आहेत. हा सगळीकडे आणि सगळ्यात असतोच. म्हणूनच कुठेही वावरण्यासाठी ह्याला विशेष मेहेनत घेऊन काही करायची / कुठे जाण्याची काहीच आवश्यकता नाही.  आणि म्हणूनच साईनाथ म्हणतात की मी कुत्र्यातही आहे, डुकरातही आहे ... सगळीकडेच आहे. बहुधा हेच सांगायला साईनाथांनी ही कथा घडवून आणली असे दिसते. 

गोविंदाचा छन्द जीवाला 
चराचराला व्यापूनि उरला 


कधीकधी आपणही कमालच करतो. साईनाथांच्या छबीपुढे अगदी पंचपक्वानाचे ताट वाढून ठेवतो, पण दारी आलेल्या भुकेलेल्या प्राण्याला, गरीबाला हाकलून लावतो. तसेच मंदिरात अगदी मोठमोठी दाने देतो, पण एखाद्या गरजू आणि गरीबाला मदत करण्यासाठी अगदी १० वेळा विचार करतो. हे ही त्या बाबाला आवडत नाही हे देखील या कथेद्वारे समजते. 

"एक तीळ सात जणात वाटून खावा" हा वाक्प्रचार आपण ऐकतो. हल्ली प्रत्येकजण एवढा लोभी झालेला असतो की एक तीळ वाटून खाणे तर सोडाच, पण कुणाला दिसू नये म्हणून तो तीळ सुद्धा लपवून आपण एकटे एकटे खायला मागे पुढे बघत नाही. साईनाथांना वाटून खाल्लेले आवडते... कारण त्यातूनच प्रेम उत्पन्न होते, आणि ते नक्कीच साईनाथांना पोचते. 

जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला ... 

दीन भुकेला दिसता कोणी, घास मुखींचा मुखी घालूनी 
दुख्ख नेत्रीचे घेता पिउनी, फोडी पाझर पाषाणाला 
तोचि आवडे देवाला...          

हा लोभ, मोह आणि हव्यास सोडायला फार मोठे मन लागते, आणि हे करणेच खूप कठीण असते. सौ. तर्खडांनी भुकेलेल्या कुत्र्याला स्वतः कडील अन्न दिले.. किती पुण्याचे काम आहे ! आणि म्हणूनच साईनाथांनी "तू दिलेले जेवण मला पोचले" अशी प्रेमळ पोचपावती दिली. अजून काय हवे नाही का ?      

नेवासकरानी तर भुजंगामध्येही साईनाथांना पाहिले. त्याच्या मनातील भाव पाहून त्या भुजंगामध्येही साईनाथ प्रकटले, त्याच्या दंश मारण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध तो वागला.. हा भाव आणि प्रेमासाठी काय वाट्टेल तो करतो आणि एक सुंदर अनुभव देतो ! 

मी तर नेवासकराएवढा ग्रेट नाही ... भुजंगामध्ये साईनाथांना पाहणे तर सोडाच, पण लांबूनही छोटा साप जरी दिसला असता तरी धूम ठोकणार्यातला मी आहे. पण कमीत कमी या कथेत साईनाथांनी जे दान करण्याचे महत्त्व सांगितले आहे ते तरी करण्याचा जरूर प्रयास करेन असेच शेवटी म्हणतो... 

         


---------------------------



कथा ३ : साईनाथांनी केलेली आठवण (वांग्याचे खरपूस काप)


आपण मनात बोललेलं सुद्धा हा साईबाबा अगदी जाणतो आणि केवळ मनात बोललेली इच्छा सुद्धा हा पुरवतो ! केवढे हे प्रेम ! याचे कारणही प्रेम ! हा भक्तांच्या मनातल्या प्रेमाखातर काहीही करू शकतो ! 

प्रेमाचा हा घननीळ रंग 
घेउनी आला गं 
प्रेमासाठी आला खाली 
सागरास मिळण्यास 

तर्खड बाईंच्या मनातील बाबांप्रती प्रेम बाबांनी ओळखले आणि तशी तिची प्रेमळ इच्छाही पूरी केली. ह्याचे नावच नाथसंविध. हा परिस्थितीला कसेही वाकवू शकतो... अर्थात भक्तांच्या मनातील प्रेमाकरताच. खरेच ग्रेट !

आजकालच्या युगात कुणावर प्रेम करणेही पाप झाले आहे. कोण कधी कसा आपला फायदा घेईल काहीच सांगता येत नाही. प्रेमाने एखाद्याचे करावे तर आपल्याच पदरात फसवणूक मिळते. फक्त ह्याचेच प्रेम पवित्र.. केवळ हाच, आपल्याला कधीही दगा, धोका न देणारा आपला सच्चा मित्र. प्रेमासाठी दसपट प्रेम करणारा ! ग्रेट ! ह्याला घट्ट बांधून ठेऊ ... 

बापू दा नंदाई मेरे बापू दा नंदाई
इनके सीवा न कोई मेरा           
इनके सीवा न कोई 



---------------------------



कथा ४ : साईनाथांनी केलेली आठवण (पेढा)
       


हा साईनाथ स्वतः ब्रह्माण्डाचा स्वामी आहे. ह्याचे भक्त अगणित. हा कुठे कुठे आणि कसा कसा भक्तांसाठी धावत जातो हे तोच जाणे ! एवढेच नाही तर आपलेच बघा. आपण दिवसातून कित्ती वेळा मनात काय काय विचार करत असतो ... अगदी ना ठरवून सुद्धा मनात वेगवेगळे विचार येतच राहतात. हे झाले एका भक्ताचे. असे अनंत भक्त आणि त्यांच्या मनातले अनंत विचार त्या क्षणाला ह्या साईनाथाला समजत असतात ! खरेच हे असामान्यत्वच आहे ह्या परमात्म्याचे ! आणि कित्येकांच्या मनोकामना हा पुऱ्या करतो ... खरेच ग्रेट !

ह्या पेढ्याच्या कथेत खालील गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात - 

१) कुणीतरी शिरडीला जाणार आहे असे म्हंटल्याबरोबर सौ. तर्खडांच्या मनात बाबा येतात... बाबाना काहीतरी प्रेमाने पाठवावे असे त्यांच्या मनात आले आहे. एखादा आप्त किंवा आपल्या घरातल्या माणसाला परंतु सध्या लांब राहात असलेल्याला जसे आपण कुणासोबत काही आठवणीने पाठवतो तस्सेच सौ. तर्खड पेढा पाठवत आहेत. इथे ही "आठवण" राहणेच खूप महत्त्वाची आहे. 

विचार करा.... आपण आपल्या देवाला दिवसातून किती वेळा आठवतो ? पण सौ. तर्खडांच्या मनात लगेच बाबा आठवणे ही त्या सतत बाबांची आठवण काढत असणार याचीच पावती आहे. त्या खरोखर एक श्रेष्ठ भक्त आहेत. 

२) घरामध्ये पेढ्याशीवाय देण्यासारखे दुसरे काहीच नाही. म्हणूनच सौ. तर्खड नाईलाजाने तो पेढा देतात. पण हा साईनाथ तो ही प्रेमाने ग्रहण करतात. हा भक्तांची परिस्थिती पाहात नाही, तर त्यांच्या मनातील साईनाथांविषयीचा भोळा भाव आणि प्रेम पहातो. 

बेसिकली साईनाथ नुसता तो नैवेद्य ग्रहण करीत नाहीत, तर त्यामागचा त्या भक्ताचा भाव आणि प्रेमच ग्रहण करतात. म्हणूनच नैवेद्य म्हणून काय देतो हे त्या साईनाथाकरता महत्तवाचे नसते, तर किती प्रेमाने तो नैवेद्य अर्पण करतो ते असते. 

३) पेढ्याचा already नैवेद्य दाखवून झाला होता.. उष्टा होता, तरीही तर्खड बाईंच्या मनात "हा मी बाबांना कसा देऊ ?" असे आले नाही... तसेच साईनाथांनी पण तो पेढा खाताना "हा आधीच नैवेद्य दाखवलेला आहे... तर मी हा ग्रहण करणार नाही" असे म्हंटले नाही. 

खरे तर जेव्हा बाईंच्या मनात बाबांना पेढा पाठवणे आले त्या क्षणाला तो बाबांना पोचलेलाच होता. तसेच आधी जेव्हा तो देवाला दाखवला होता त्या वेळेसही तो बाबांना अर्पण झालाच होता. 

म्हणजेच ह्याच्या प्रेमाला काहीच नियम नाहीत, मर्यादा नाहीत. हा भक्ताने जे काही प्रेमाने दिले आहे त्याचा हा अगदी प्रेमाने स्वीकार करतो आणि भक्ताला संतुष्ट करतो. दाखवलेला पेढा पहिल्यांदी बाबांना दाखवत आहे की दहाव्यानदा.. त्यावर काहीच अवलंबून नाही. 

शबरीची उष्टी बोरे मोहविती ह्याला 
हावरा हा भक्तिप्रेमा विके कवडीमोला 

सर्व रंग सोडून झाला बापू हो सावळा 
श्याम मेघ जीवन देई त्यासी बापू भुलला 

४) ज्या मुलाबरोबर तो पेढा पाठवलेला तो मुलगा सुतकी होता.. तरीही बाबांना कसलाच फरक पडला नाही. मुळात हाच पवित्रता. ह्याला कसले सुतक आणि काय... कसलेच नियम नाहीत...  नियम फक्त प्रेमाचा !

एक महत्तवाचे म्हणजे बाईला सुद्धा पेढा देताना हा विचार मनात आला नाही. काय प्रचंड कनेक्शन आहे बाबा आणि त्या बाईचे ! विश्वास, प्रेम कसे असावे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही बाई ! बाबा माझा पेढा नक्की खाणार हा तिचा प्रचंड विश्वास आहे.. नव्हे खात्रीच आहे !

शेवटी एवढे सारे होउनही तो मुलगा पेढा द्यायला विसरलाच ! आणि तेही तीन वेळा ... पण बाबांना सारेच माहीत आहे. प्रेमाने दिलेला पेढा खाल्याशिवाय त्यांना तरी कुठे चैन पडणारे !

ह्या साऱ्या गोष्टींवरून एक मला समजले. आपल्याला अध्यात्मातल्या मोठमोठ्या गोष्टी नाही कळल्या तरी पुरे. काहीच गरज नाही. फक्त ह्याच्यावर मनापासून प्रेम केलं ना, तरी बेडापार होईल ...          

       


              

            



      







       


  



              


    


















              

0 comments: