श्रीगुरूचरित्र अवतरणिका

07:50:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 


ॐ ओमकारा गुरुदेव दत्त 

सद्गुरू रामचंद्र महाराज की जय 

सद्गुरु ॐ स्वामी महाराज की जय

गुवरुचरित्र

अध्याय बावन्नावा


श्रीगुरूचरित्र अवतरणिका

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 

श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुरेव परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः ।। ॐ।।

श्रोते हो ! सावधानचित्ताने ऐका ! श्रीगुरूचरित्राचे एकावन्न अध्याय श्रवण केले असता नामधारकाची भावसमाधी लागली . तो निजानंदात मग्न झाला. श्रीगुरूचरित्रामृत सेवन करून तो तटस्थ झाला. त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव मिर्माण झाले. सर्वांगावर घामाचे बिंदू उत्पन्न होऊन रोमांच उभे राहिले. कंठ दाटून आला. सर्वांगाला कंप सुटला. त्याच्या डोळ्यांवाटे प्रेमाश्रू वाहू लागले. शरीराची हालचाल बंद झाली. तो समाधिसुखात आनंदाने डोलत होता. ते पाहून सिद्धयोग्यांना परमानंद झाला.


त्यांनी त्याला प्रेमाने कुरवाळून सावध केले. त्याला गाढ प्रेमालिंगन देऊन ते म्हणाले, "बाळ, नामधारका, तू खरोखर भवसागर तरुन गेला आहेस; पण तू असा समाधी अवस्थेत राहिलास तर तुला मिळालेले ज्ञान तुझ्याच ठिकाणी राहील. मग लोकांचा उद्धार कसा होईल ? तू वारंवार विचारलेस म्हणूनच मला श्रीगुरूंची अमृतवाणी आठवली. ती त्रिविधतापांचा, सर्व दुःखाचा नाश करणारी आहे. तुझ्यामुळेच मला श्रीगुरुचरित्र आठवले. तुही ते एकाग्रचित्ताने श्रवण केलेस." सिद्धयोगी असे बोलले असता नामधारकाने डोळे उघडले. तो हात जोडून उभा राहिला व सिद्धयोग्यांना म्हणाला, "स्वामी, तुम्ही खरोखर कृपातरू आहात. या विश्वाचे तुम्ही आधार आहात. तुमच्या कृपेनेच संसारसागर पार करता येतो. माझ्यावर तुमचे अनंत उपकार आहेत.


आता माझी एक विनवणी आहे अमृतापेक्षा श्रेष्ठ अशा श्रीगुरूचरित्रामृताची अवतरणिका मला सांगा. आपण सांगितलेल्या श्रीगुरूचरित्रामृतात भक्तजनांच्या चितवृत्ती बुडून गेल्या असल्या, तरी मी अद्यापही अतृप्त आहे. मला श्रीगुरूचरित्रामृत पाजून आनंदसागरात ठेवा. अनेक औषधी वनस्पतींचे सार काढून ते दिव्य औषध काढतात, त्याप्रमाणे श्रीगुरूचरित्रामृताचे सार मला सांगा."


नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, "बाळा, तुझी श्रीगुरुचरित्रावर अखंड श्रद्धा राहो. त्यासाठी मी तुला श्रीगुरूचरित्राची अवतरणिका सांगतो, ती ऐक.


पहिल्या अध्यायात मंगलाचरण असून सर्व देवदेवतांचे स्मरण केले आहे. भक्तजनांना श्रीगुरूमूर्तीचे दर्शन घडले आहे.


दुसऱ्या अध्यायात ब्रम्होत्पत्ती सांगितली असून चारी युगांची वैशिष्ट्ये कथन केली आहेत. त्याच अध्यायात गुरुमाहात्म्य व संदीप आख्यान आले आहे.


तिसऱ्या अध्यायात अंबरीष आख्यान सांगितले आहे.


चौथ्या अध्यायात सती अनुसूयेची सत्वपरीक्षा पाहण्यासठी आलेले त्रैमूर्ती तिची बालके होतात, ती त्रैमूर्ती श्रीदत्तात्रेय अवतार कथा सांगितली आहे.


पाचव्या अध्यायात श्रीदत्तात्रेयांच्या श्रीपादश्रीवल्लभ अवताराची कथा आली असून, सहाव्या अध्यायात गोकर्णमहिमा व महाबळेश्वरलिंग स्थापनेची कथा सांगितली आहे.


आठव्या अध्यायात शनिप्रदोषव्रत माहात्म्य वर्णिले असून, नवव्या अध्यायात श्रीगुरुंनी एका रजकाला राज्यप्राप्तीचा वर दिल्याची कथा आली आहे.


दहाव्या अध्यायात कुरवपूर क्षेत्र महिमा सांगितला असून. वल्लभेश आख्यान सविस्तर वर्णिले आहे.


अकराव्या अध्यायात करंजपुरी माधव व अंबा यांच्या पोटी श्रीनृसिंहसरस्वतींचा अवतार झाल्याचे व श्रीगुरू नरहरी बालचरित्रलीला वर्णन केले आहे.


बाराव्या अध्यायात नरहरीचा गृहत्याग, काशीक्षेत्री संन्यास ग्रहण व गुरु-शिष्य परंपरा हे विषय आले आहेत.


तेराव्या अध्यायात श्रीगुरूनृसिंहसरस्वतींचे करंजागावी आगमन व पोटदुखी असलेल्या एका ब्राम्हणावर श्रीगुरुंनी कृपा केली या कथा सांगितल्या आहेत.


चौदाव्या अध्यायात क्रूरयवन शासन व सायंदेव वरप्रदान कथा आल्या आहेत.


पंधराव्या अध्यायात श्रीगुरुंचे वैजनाथक्षेत्री गुप्त वास्तव्य व तीर्थयात्रा निरुपण आले असून, सोळाव्या अध्यायात गुरुभाक्तीचे माहात्म्य, धौम्य शिष्यांच्या कथा सांगितल्या आहेत.


सतराव्या अध्यायात भुवनेश्वरीला जीभ कापून देणाऱ्या एका मंदबुद्धीच्या मुलास श्रीगुरू ज्ञानप्राप्ती करून देतात ही कथा सांगितली असून,


अठराव्या अध्यायात अमरापूरमाहात्म्य सांगून श्रीगुरूकुपेने एका ब्राम्हणाचे दारिद्र्य कसे गेले ही कथा सांगितली आहे.


एकोणिसावा अध्यायात औदुंबरमाहात्म्य, नावाड्याची त्रिस्थळी यात्रा व योगिनी कथा हे विषय आले आहेत.


विसाव्या अध्यायात ब्राम्हण स्त्रीची पिशाचबाधा कशी दूर केली हे सांगितले आहे.एकविसाव्या अध्यायात औदुंबर येथे आलेल्या श्रीगुरुंनी एका मृतबालकाला सजीव केल्याची कथा असून,


बाविसाव्या अध्यायात श्रीगुरुंनी एक वांझ म्हैस दुभती केल्याचा चमत्कार सांगितला आहे.


तेविसाव्या अध्यायात श्रीगुरूगाणगापुरात येतात व एका ब्रम्हराक्षसाचा उद्धार करतात या कथा दिल्या असून, चोविसाव्या अध्यायात त्रिविक्रमभारतीचा उद्धार केल्याची कथा आहे.


पंचविसाव्या अध्यायात गर्विष्ठ ब्राम्हणांचा 'जयपत्राविषयी हट्ट' हा प्रसंग सांगितला असून, सव्विसाव्या अध्यायात वेदविस्तार वर्णिला आहे.


सत्ताविसाव्या अध्यायात उन्मत्त ब्राम्हणांना श्रीगुरुंनी दिलेला शाप व एका मातंगाला पूर्वजन्म स्मरण करून दिल्याच्या कथा आहेत.


अठ्ठाविसाव्या अध्यायात कर्मविपाक व मातंग कथा आली आहे, एकोणतिसाव्या अध्यायात भस्ममाहात्म्य सांगितले आहे.


तिसाव्या अध्यायात एका विधवेचा शोक व ब्रम्हचाऱ्याने तिला केलेला उपदेश हे विषय आले असून,


एकतिसाव्या अध्यायात पतिव्रतेचा आचारधर्म सांगितला आहे.


बत्तिसाव्या अध्यायात विधवेचा आचारधर्म सांगितला असून, मृत ब्राम्हण जिवंत झाल्याची कथा सांगितली आहे.


तेहतिसाव्या अध्यायात रुद्राक्षमाहात्म्य व सुधर्मतारक आख्यान आले आहे.


चौतिसाव्या अध्यायात रुद्रध्यायात सांगितले आहे. पस्तिसाव्या अध्यायात कच-देवयानी कथा व सोमवार व्रत व सीमंतिनी आख्यान आले आहे.


छत्तिसाव्या अध्यायात परान्न्दोष, धर्माचरण हे विषय आले असून, सदतिसाव्या अध्यायात गृहस्थाश्रमाचा आचारधर्म सांगितला आहे.


अडतिसाव्या अध्यायात श्रीगुरुंनी भास्कर ब्राम्हणाची लाज कशी राखली हे सांगून, एकोणिसाव्या अध्यायात अश्वत्थमाहात्म्य व साठ वर्षांच्या वंध्येस संतानप्राप्ती झाल्याची कथा आहे.


चाळीसाव्या अध्यायात नरहरीचा कुष्ठरोग कसा नाहीसा झाला हे सांगून, शिवभक्त शबरकथा सांगितली आहे.


एकेचाळीसाव्या अध्यायात सायंदेवाची गुरुसेवा, काशीयात्रा व त्वष्टाख्यान हे विषय आले आहेत.


बेचाळीसाव्या अध्यायात अनंतव्रत कथा आली असून,


त्रेचाळिसाव्या अध्यायात विमर्षण राजाची कथा व एका विणकरास मल्लिकार्जुन हे विषय आले आहेत.


चव्वेचाळीसाव्या अध्यायात श्रीगुरूंनी नंदीब्राम्हणाचा कुष्ठरोग घालविल्याची कथा सांगितली आहे.


पंचेचाळीसाव्या अध्यायात भक्तवत्सल श्रीगुरुंनी आपल्या भक्तांसाठी आठ रूपे धारण केल्याची कथा सांगितली आहे.


सत्तेचाळीसाव्या अध्यायात श्रीगुरुंनी एका शुद्र शेतकऱ्यावर कृपा केल्याची कथा सांगितली आहे. अठ्ठेचाळीसाव्या अध्यायात अमरजासंगम व अष्टतीर्थमाहात्म्य सांगितले आहे.


एकोणपन्नासाव्या अध्यायात गुरुमाहात्म्य व शिवपार्वती संवादात्मक संपूर्ण गुरुगीता आली आहे.


पूर्वजन्मातील एक श्रीगुरुभक्त यवन वंशात जन्मास येतो व श्रीगुरुंनी त्याला दिलेल्या पूर्वीच्या वरदानाने तो बिदरचा राजा होतो ती सविस्तर कथा पन्नासाव्या अध्यायात आली आहे.


एकावन्नाव्या अध्यायात श्रीगुरूनृसिंहसरस्वतींचे निजानंदगमन, अवतार-समाप्ती झाल्याची कथा दिली आहे.


सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरूचरित्र अनंतअपार आहे. त्यातून मी तुला केवळ एकावन्न अध्याय सांगितले आहे. त्यांची अवतरणिका तुला सांगितली. नामधारका, श्रीगुरू अवतार-समाप्ती करून गेले असे लोकांना वाटत असेल; पण ते आजही गाणगापुरात आहेत हे लक्षात ठेव. या कलियुगात अधर्मवृत्ती फार वाढली आहे हे पाहून श्रीगुरू गुप्त झाले आहेत. खऱ्या भक्तांना ते आजही दर्शन देतात. नामधारका, मी सांगितलेल्या श्रीगुरूचरित्राच्या अवतरणिकेचे जे नित्य श्रवण-पठण करतील त्यांना श्रीगुरू नक्कीच भेटतील. आपला जसा भाव असेल तसे फळ श्रीगुरू देतात. नामधारका, तू अवतरणिका सांगण्याची विनंती केलीस, त्यानुसार सगळा इतिहास मी तुला पुन्हा सांगितला. ज्यांनी पूर्वीच श्रीगुरुचरित्राचे श्रवण-पठण केले असेल त्यांना या अवतरणिकेमुळे सगळे काही आठवेल. इतरांना ही अवतरणिका वाचून संपूर्ण श्रीगुरुचरित्र पठण-श्रवणाची इच्छा होईल." सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, आता या श्रीगुरूचरीत्राचा पारायण विधी मला सांगा. पारायण करताना दररोज किती अध्याय वाचावेत ते मला सांगा." त्यावर सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलास. यामुळे लोकांच्यावर फार मोठा उपकार होणार आहे. आता तुला पारायणाविषयी सांगतो. आपले अंतःकरण पवित्र असताना दररोज शुचिर्भूतपणे जमेल तेवढे श्रीगुरुचरित्र वाचावे. दुसरा प्रकार पारायणविधी केले असता फार मोठे पुण्य प्राप्त होते. दिनशुद्धी पाहून - म्हणजे शुभ दिवशी पारायणाला प्रारंभ करावा. प्रथम स्नानसंध्या करावी. जेथे पारायण करावयाचे ती जागा पवित्र करावी. रांगोळ्या काढाव्यात. देशकालादी संकल्प करून ग्रंथरुपी श्रीगुरुंचे यथाविधी पूजन करावे. ब्राम्हणाचीही पूजा करावी. प्रथमदिवसापासून पारायण संपेपर्यंत एकाच स्थानी बसावे.


वाचन चालू असताना अनावश्यक अथवा भाषण करू नये. ब्रम्हचर्यादी नियम कसोशीने पाळावेत. पारायण चालू असताना दिवा (समई इ.) प्रज्वलित असावा. देव, ब्राम्हण व घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पूर्वोत्तर मुख करून बसावे व वाचनास प्रारंभ करावा.


प्रतिदिवशी वाचावयाची अध्यायसंख्या -


पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचावेत.


दुसऱ्या दिवशी आठ ते अठरा अध्याय वाचावेत.


तिसऱ्या दिवशी एकोणीस ते अठ्ठावीस अध्याय वाचावेत.


चौथ्या दिवशी एकोणीस ते चौतीस अध्याय वाचावेत.


पाचव्या दिवशी पस्तीस ते सदतीस अध्याय वाचावेत.


सहाव्या दिवशी अडतीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावेत.


सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते एकावन्न अध्याय वाचावेत.


शेवटी अवतरणिका ( बावन्नावा अध्याय ) वाचावी.


रोजचे ठराविक वाचन पूर्ण झाले की ग्रंथाचे उत्तरांगपूजन करावे. श्रीगुरू नृसिंहसरस्वतींना नमस्कार करून आसन सोडावे. मग फलाहार करावा. सात दिवस रात्री जमिनीवर झोपावे. सदैव शास्त्राधारे पवित्र, व्रतस्थ असावे. पारायण पूर्ण झाल्यावर ब्राम्हण-सुवासिनीस भोजन द्यावे. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. सर्वांना संतुष्ट करावे.


अशारीतीने सर्व नियमांचे पालन करून सप्ताह पारायण पूर्ण केले असता श्रीगुरुंचे दर्शन होते. भूतप्रेतादी बाधा नाश पावून सर्व सुखांची प्राप्ती होते.


सिद्ध्योग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला. 'आपण धन्य झालो. कृतकृत्य झालो.' असे म्हणून त्याने सिद्ध्योग्यांच्या चरणांवर मस्तक टेकले. सिद्ध्योग्यांचे शब्द हीच रत्नांची खाण. नामधारकाने त्यातील रत्ने घेऊन एकावन्न रांजण भरले व याचकभक्तांना संतुष्ट केले. सिद्धयोगी हाच कल्पवृक्ष. नामधारकाने भक्तजनांवर परोपकार करण्यासठी हात पसरून याचना केली. सिद्धमुनी हाच मेघ, नामधारक हा चातक. त्याने मुख पसरून त्या मेघाकडे एक बिंदू मागितला असता त्या मेघाने अपार वर्षाव करून भक्तांना अमृताचा लाभ करून दिला.


अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीगुरूचरित्र अवतरणिका' नावाचा अध्याय बावन्नावा समाप्त.


॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

You Might Also Like

0 comments: